राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, त्यापार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. मात्र, तरीही राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकार पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन करण्याचा विचार करत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक हे कडक लॉकडाऊन लावण्यात यावा, यासाठी आग्रही आहेत. राज्यात संचारबंदी असताना आणि कोरोनाचा फैलाव वेगाने होत असताना नागरिकांनी कोरोनाचं गांभीर्य लक्षात घ्यायला हवे, असे मत व्यक्त केले. कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला नाही तर महाराष्ट्रात दीर्घकाळ लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागेल, अशी भीती कोव्हिड टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक यांनी व्यक्त केली असून यासाठी त्यांनी इंग्लंडचे उदाहरण दिले.
पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन व्हावा
इंग्लंडमध्ये जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला दुसरी लाट आल्यानंतर देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला होता. मला लोकांना घाबरावायचे नाही. मात्र, इंग्लंडमधला हा लॉकडाऊन ९२ दिवस म्हणेजच साधारण तीन महिन्यानी लांबला होता. महाराष्ट्रावर तशी परिस्थिती येऊ नये म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव वेळीच आटोक्यात आणला पाहिजे, असे डॉ. संजय ओक म्हणाले. यापुढे ते असेही म्हणाले की, सध्याच्या कडक निर्बंधबाबत मी समाधानी नाही. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी निर्बंध आणखी कडक करणे गरजेचे आहे. पूर्वीसारखा कडक लॉकडाऊन व्हावा, असंच मला सूचित करायचे आहे.
… तर भारत कोरोनामुक्त होणार
लॉकडाऊन, लसीकरण आणि नागरिकांची स्वयंशिस्त या त्रिसूत्रीच्या जोरावरच कोरोनाचा कहर आणि दुसरी लाट थांबवणं शक्य आहे, नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले आणि वेगाने लसीकरण केले तर भारत लवकर कोरोनामुक्त होईल हे निश्चित होईल, असे संजय ओक यांनी म्हटले. तर कोरोना लसीकरण अधिक वेगाने होणे अपेक्षित असून जून महिन्याच्या अखेरपर्यंत भारतामधील बहुसंख्य लोकसंख्येला लस मिळाली तर या वर्षाच्या अखेरपर्यंत भारत कोरोनामुक्त होऊ शकतो, असा दावा डॉ. संजय ओक यांनी केला आहे.