सोलापूर : मराठा आरक्षणापाठोपाठ आता राज्यात धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा पेटत असल्याचे चित्र आहे. कारण, आज सोलापूरमध्ये धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्याने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळून राग व्यक्त केला आहे. भंडारा उधळणाऱ्या कार्यकर्त्याला आधी चोप दिल्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे मात्र राज्यात खळबळ उडाली आहे.(Dhangar Reservation: Dhangar Reservation Action Committee worker destroyed the storehouse on Vikhe Patals!)
राज्यातील राजकीय उलथापालथीनंतर आता कुठेतरी स्थिरता येत असतानाच मराठा समजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण उधळून लावण्यासाठी 1 सप्टेंबर रोजी मराठा आंदोलकांवर लाठीहल्ला करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण राज्यात मराठा आंदोलन पेटल्याचे दिसून आले. या उपोषणावर अद्यापही तोडगा निघालेला नसतानाच आज सोलापूर दौऱ्यावर असलेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या धनगर आरक्षण कृती समितीच्या सदस्यांने चक्क विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळून आपला राग व्यक्त केला.
शंकर बंगाळे हा धनगर आरक्षण कृती समितीचा सदस्य असून, तो आज सोलापूरमध्ये आलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यासाठी भेटण्यासाठी गेला असता त्याने विखे पाटील यांच्यावर भंडारा उधळून राग व्यक्त केला.
हेही वाचा : कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर बायडन भारताकडे रवाना; सायंकाळी करणारा मोदी स्वागत
आधी चंद्रकांत पाटील यांच्यावर फेकली होती शाई
काही महिन्यांपूर्वीच मंत्रीमंडळातील चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाई फेकण्यात आली होती. या घटनेच्या काही वेळातच पोलिसांनी शाई फेकणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले होती.
हेही वाचा : मुख्यमंत्री शिंदेंसह फडणवीस-अजित पवार पंचतारांकित शेतकरी, दुष्काळावरून ठाकरे गटाचा हल्लाबोल
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही करुन दिली होती आठवण
2017 मध्ये नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, हंसराज अहिर, महादेव जानकर यांच्या उपस्थितीत धनगर आरक्षण निर्णायक मेळावा पार पडला होता. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे धनगर समाजाने भाजपला भरभरुन मते दिली. मात्र सत्तेवर येऊनही धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेले नसल्याने फडणवीस यांच्या भाषणाआधी क्या हुआ तेरा वादा हे गित लावून धनगर समाजाच्या आरक्षणाची आठवण करून दिली होती.
धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने धनगर समाज घटनादत्त एसटी आरक्षणाचा अंमलबजावणी त्वरीत करावी, आणि त्याच बरोबर ओबीसी आरक्षणाला कुठल्याही प्रकारचा धक्का लावू नये, यासाठी निवेदन दिले होते. विखे पाटलांना आव्हान करतो की, आरक्षणाची अंमलबजावणी न झाल्यास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना काळे फासायला धनगर समाज मागेपुढे पाहणार नाही.
-शंकर बंगाळे, धनगर आरक्षण कृती समिती सदस्य.