मुंबईः बदला घेण्याची, सूड घेण्याची खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच. पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी पातळी सोडून केलेल्या टिकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून हे प्रत्युत्तर दिले.
बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही.
आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळी आमची वृत्तीच नाही.
आम्हाला बदल घडवायचा आहे…
या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचाय …
गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल…— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 27, 2023
आम्हाला बदल घडवायचा आहे. या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचा आहे. स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीटमध्ये नमूद केले.
मुंबईत झालेल्या भारतीय कामगार सेनेच्या वार्षिक सभेतून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकारे यांनी शिंदे सरकारवर टीका केली. ज्या पद्धतीने पाठीत वार करून सरकार पाडलं त्याचा सूड आणि बदला मी घेणारच, असा थेट इशाराच ठाकरेंनी शिंदे सरकारला दिला. उद्धव ठाकरे यांच्या या इशाऱ्याला मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट करुन उत्तर दिले.
आजच्या सभेत उद्धव ठाकरे यांची भारतीय कामगार सेनेच्या सल्लागारपदी तर, अरविंद सावंत यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. महाराष्ट्रात सध्या कामगारांचे सरकार नाही. तर महाराष्ट्राचे काम गार करणार सरकार आहे. राज्यात आता उद्योग आहेत कुठे?, जे काही उद्योग येणार होते. ते ओरबाडून परराज्यात नेले आहेत. मी मुख्यमंत्री असताना २५हून अधिक उद्योग महाराष्ट्रात यावे, यासाठी करार केले होते. त्यापैकी काहींनी गुंतवणुकीस सुरूवातही केली होती. मात्र, पाठीत वार करून आपलं सरकार पाडलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.