बीड : आगामी लोकसभा निवडणुकीची कधीही घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील भाजपा आणि काँग्रेस पक्षाने पहिली उमेदवारी यादी घोषित केली आहे. याशिवाय महायुती आणि महाविकास आघाडी राज्यातील जागावाटपासंदर्भात बैठका होताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील अनेक जण इच्छुक आहेत, मात्र सर्वात जास्त चर्चा बीड लोकसभा मतदार संघाची होताना दिसत आहे. भाजपा नेते पंकजा मुंडे यांचे नाव याठिकाणी चर्चेत आहे. अशातच आता त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. 5 वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको, असे त्यांनी म्हटले आहे. (Five years of exile is too much no more exile Pankaja Mundes emotional condolences to the workers)
हेही वाचा – Nilesh Lanke : राजकारण क्षणाक्षणाला बदलत असतं, शरद पवारांच्या पक्षात जाण्याबाबत संदिग्धता
पंकजा मुंडे यांच्या हस्ते (रविवारी 10 मार्च) शिरूर कासार तालुक्यातील मानूर येथे गोपीनाथ गडाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले की, एखाद्याला फ्रॅक्चर झालं तर त्याला फोन करणे माझ्याकडून राहून जात असेल. पण समाजासाठी निर्णय घेताना लाखो लोकांचे भले होणार असेल, तर तेव्हा तुमची ताई मागेपुढे अजिबात पाहत नाही. कुणालाही शरण जात नाही, कधी झुकत नाही, चुकत नाही आणि रुकत नाही. मग तुम्ही माझ्यासोबत राहणार की नाही? असा प्रश्न उपस्थित करत त्या म्हणाल्या की, एवढे दिवस वनवास भोगला आहे. वनवास म्हटलं की पाचचं वर्षांचा वनवास या युगात असावा. कारण जुन्या काळात वनवास 14 वर्षांचा होता. त्यामुळे माझा 5 वर्षांचा वनवास खूप झाला का अजून पाहिजे तुम्हाला? मग तुम्ही सगळे आहात ना माझ्यासोबत? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना विचारले.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला माहीत नाही ईश्वराने माझ्या भाग्यात काय लिहीलं आहे. आतापर्यंत जे काही लिहीलं होतं, त्याच्यात मला तुमच्या प्रेमाव्यतिरिक्त फार काही मिळालेलं नाही. माझ्या जीवनाबद्दल मी फार काही बोलत नाही. पण मी फार दु:ख, यातना, वेदना भोगल्या आहेत. हे सर्व भोगूनही मी चेहऱ्यावर हास्य ठेवते, नको असतानाही चेहरा हसरा ठेवते ते केवळ तुमच्यामुळे, तुम्ही नाही तर मला आयुष्यात काही नाही, अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली.
खड्ड्यात गेलं ते पद-बिद
पंकजा मुंडे म्हणाल्या की, खड्ड्यात गेलं ते पद-बिद, मला काही घेणं-देणं नाही. पण तुमचं प्रेम हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. तुम्हाला चांगला विकास देऊन, सन्मार्ग देऊन, त्या प्रेमाची मी पावती देणार आहे, त्याची परतफेड मी करणार आहे. माझ्यामुळे तुम्हाला मान खाली घालावे लागेल असं मी काहीही कृत्य करणार नाही. पण असे झाले तर तो माझ्या जीवनातला शेवटचा दिवस असेल, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.