नवी दिल्ली – राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह तात्पुरत्या स्वरुपात गोठवल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी झाली नव्हती. त्यामुळे आजच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. पाच न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर आज ही सुनावणी होणार आहे.
शेवटची सुनावणी २७ सप्टेंबर रोजी झाली होती. त्यानंतर, ऑक्टोबर महिन्यात अनेक सुट्ट्या आल्याने सुनावणी होऊ शकली नाही. त्यामुळे पुढील सुनावणी आज, १ नोव्हेंबर रोजी होईल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार, आज सुनावणी होणार असून सर्वोच्च न्यायालयात दोन्ही पक्ष काय बाजू मांडतील याकडे लक्ष लागलं आहे.
हेही वाचा – 1 नोव्हेंबरला होणार महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षासंदर्भात अनेक याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर आज न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यी घटनापीठात ही सुनावणी होणार आहे. न्या.एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, हिमाकोहली, न्या. पी नरसिंहा हे या घटनापीठात सामील आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या सुनावणीत पहिल्याच क्रमांकावर हे प्रकरण असणार आहे. या प्रकरणातील मूळ मुद्द्यांवर आज चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटनापीठाचे कामकाज सरळ होणार की नाही याबद्दलही स्पष्टता होणार असल्याची शक्यता आहे.
शेवटच्या सुनावणीत काय ठरलं?
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर २७ सप्टेंबर रोजी महत्त्वाची सुनावणी झाली. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षचिन्हावर निर्णय घेण्याची मुभा दिली. परंतु, अनेक मुद्द्यांवरची याचिका अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे. तसंच, मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत २७ सप्टेंबरला महत्वाची सुनावणी होणार होती. मात्र, न्यायालयाच्या कामकाजात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतचे प्रकरण आले नाही. त्यामुळे याप्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आले होते. परिणामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.