राज्यात मशिदींवरील भोंग्यांवरुन राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडवा मेळाव्यात भाषणादरम्यान मशिदींवरील भोंगे काढा अन्यथा त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा पकडून भाषणात हल्लाबोल केला आहे. तसचे भाजपकडूनही भोंगे काढण्याची मागणी करण्यात येत आहे. भोंग्यांच्या मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार आमने-सामने आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील राज ठाकरेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. परंतु सोमवारी गृहमंत्री वळसे पाटील यांच्या भाषणादरम्यान जवळ असलेल्या मशिदीमध्ये अजान सुरु झाल्याचा प्रकार घडला. गृहमंत्री वळसे पाटील यांनी आपले भाषण मध्येच थांबवले आहे.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सोमवारी शिरुरमध्ये जाहीर सभेत व्यासपीठावरुन भाषण देत होते. त्यांच्या भाषणादरम्यान जवळपास असणाऱ्या एका मशिदीमध्ये अजान सुरु झाली. भोंग्याच्या आवाजामुळे अजान सभेच्या ठिकाणी एकू येत होती. गृहमंत्र्यांनी अजान सुरु होताच आपले भाषण काही वेळासाठी थांबवले होते. थोडा वेळात अजान संपल्यानंतर त्यांनी पुन्हा आपल्या भाषणाला सुरुवात केली. रमजानचा महिना सुरु आहे. यादरम्यान वळसे पाटील यांच्या भाषणातच अजान सुरु झाली आणि त्यांनी भाषण थांबवले असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
#WATCH Maharashtra Home Minister Dilip Walse Patil halts his speech midway for Azaan, at an event in Shirur, earlier today pic.twitter.com/IpV35YuIAr
— ANI (@ANI) April 4, 2022
अजितदादांच्याही सभेत अचानक सुरु झाली होती अजान
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबतही असाच प्रकार घडला होता. अजित पवार पुण्यात सभेत संबोधित करत असताना मध्येच अजान सुरु झाली होती. अजान सुरु झाल्यानंतर अजित पवार यांनी आपले भाषण थांबवले होते. तर आणखी एकदा दुसऱ्या सभेत बोलत असताना अजित पवार यांच्या भाषणादरम्यान अजान सुरु झाली होती. यावेळी अजित पवारांनी भाषण थांबवत पिण्यासाठी पाणी मागितले होते.
मशिदींवरील भोग्यांमुळे राजकारण तापलं
राज्यात मशिदींवरील भोग्यांमुळे राजकारण तापलं आहे. राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्यात यावे अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीसुद्धा भोग्यांविरोधात भूमिका घेतली आहे. मशिदींवरील भोंगे काढण्यात यावे अन्यथा मशिदींसमोर दुप्पट आवाजात भोंगे लावून हनुमान चालीसा लावण्यात येईल असा इशारा राज ठाकरेंनी दिला असून मनसैनिकांना तसे आदेश दिले आहेत.
हेही वाचा : ‘गैरसमज काही लोक करून देतात’; मुस्लिम मनसैनिकांच्या नाराजीवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया