नागपूर – “सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशींसोबतच इतर प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती नेमण्यात आली असून, या समितीच्या शिफारशींना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता घेऊन लाभ दिले जातील,” असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधीला उत्तर देतांना सांगितले. या विषयावर सदस्य संजय केळकर, संजय गायकवाड, योगेश सागर, आशिष जयस्वाल आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता.
हेही वाचा – बोगस डॉक्टरांविरोधात शोधमोहीम गतिमान करणार, गिरीश महाजनांची ग्वाही
सामंत पुढे म्हणाले, “सफाई कामगार वारसांच्या विषयांशी निगडीत प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी तत्कालीन कामगार आयुक्त लाड आणि तत्कालीन सभापती पागे यांच्या समितीने केलेल्या शिफारसी शासनाने सन १९७५ ला स्वीकारल्या. त्यानंतर वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात आले. हे सर्व शासन निर्णय एकत्रित करून लाड -पागे समितीने केलेल्या शिफारसींनुसार सफाई कामगारांना शासकीय सेवेचा लाभ देण्याबरोबरच इतर विषयांवरचा अहवाल या उपसमितीमार्फत देण्यात येणार आहे.”
“शासकीय सेवेचा लाभ देताना सफाई कामगारांच्या वारसांच्या कामाचं स्वरूप कसे असेल? भरती प्रकिया कशी राबविता येईल? वेतन भत्ते काय असावेत? पंधरा वर्षांपेक्षा जास्त सेवा झालेल्या कामगारांच्या वारसांची नोंदणी करून घेणे, त्यांना कायमस्वरूपी निवासस्थान देणे आदी सभागृहात सदस्यांनी सुचविलेल्या विषयांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे”, असे सामंत यांनी सांगितले.
हेही वाचा – विदर्भाला काय दिलं? ठाकरेंच्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांकडून घोषवाक्यातून उत्तर