मुंबईः गेल्या काही दिवसांपासून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आणि भाजप यांच्यातील शाब्दिक युद्ध शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळालं. नवाब मलिक आरोप करायचे आणि भाजपवाले त्याचा पलटवार करायचे असं काहीसं सुरू होतं. आता हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नवाब मलिकांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. महाविकास आघाडीचं सरकार कोसळणार, असं भाजप नेते वारंवार बोलत असतात, त्याचाच आता नवाब मलिकांनी समाचार घेतलाय.
नवाब मलिक हे माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. सरकार खंबीर आहे, दोन वर्ष पूर्ण झालीत. पाच वर्ष पूर्ण करू आणि पुढे निवडून येऊ. भाजप सत्ता गमावल्यानंतर वेगवेगळ्या मार्गांनी काही पण बोलत राहतायत. पण आता त्यांनाही वाटू लागलंय की, सरकार ते पाडू शकत नाही, असंही नवाब मलिक म्हणालेत.
आदित्य ठाकरे असतील, मी असणार किंवा इतर मंत्री असतील. सरकार न आल्यानं काही संघटना विचलित झालेल्या आहेत. पानसरेंची हत्या असेल. दाभोलकरांची हत्या असेल ही संघटना यांच्या मागे आहे काय, यांचा गोवा, कर्नाटक कनेक्शन आधीपासून होतं. विषय गंभीर आहे, गृहविभागानं याकडे गंभीरतेने पाहिलं पाहिजे. याचा शोध लावला पाहिजे की, कोण लोक ही पत्रे पाठवतायत, असंही नवाब मलिकांनी अधोरेखित केलंय.
विशेष म्हणजे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार पडण्याची भविष्यवाणी करून महाराष्ट्रातले भाजप नेते थकत कसे नाहीत, असा प्रश्न सर्वसामान्य माणसाला आता पडू लागलाय. अनेकदा महाराष्ट्रातील भाजपच्या प्रत्येक प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडण्याच्या तारीख पे तारीख जाहीर केल्या होत्या. काही वेळा यासंबंधी लोकांना खरेच विश्वास वाटेल, असे वातावरण निर्माण केले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. शिवसेना, काँग्रेस आणि स्वपक्ष असा प्रवास करत भाजपमध्ये आलेले नारायण राणे यांनी तर काही दिवसांपूर्वी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार जाऊन मार्चमध्ये भाजपचे सरकार येईल, अशी भविष्यवाणी केली होती. गेल्या वर्षी राणेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केली होती.