घरमहाराष्ट्रआरोग्य विभागात जंबो भरती

आरोग्य विभागात जंबो भरती

Subscribe

राज्याच्या आरोग्य विभागात मोठी रोजगार भरती करण्याची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्य विधान मंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करण्याकडे एक पाऊल टाकले आहे. येत्या 28 फेब्रुवारीला परीक्षा घेऊन आरोग्य विभागात 50 टक्के जागा भरण्याची घोषणा टोपे यांनी औरंगाबाद येथे केली आहे. मार्च महिन्यात ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. आरोग्य विभागात एकूण 17 हजार जागा रिक्त आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात साडेआठ हजार जागा भरल्या जाणार आहेत. त्यातील सुरुवातीला 5 हजार जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात येत असल्याचे टोपे यांनी जाहीर केले आहे.

आरोग्य विभागात सर्वाधिक रिक्त असलेल्या जागांपैकी सामाजिक अधीक्षक(भौतिकशास्त्र), फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक, व्यावसायिक थेरपिस्ट, ज्युनियर लिपिक, सामाजिक अधीक्षक(वैद्यकीय), प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, नेत्र चिकित्सा अधिकारी, नॉन वैद्यकीय सहाय्यक, सांख्यिकीय अन्वेषक, रासायनिक सहाय्यक, बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट, ज्युनियर इंजिनिअर, मीडिया मेकर, टेलिफोन ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, कुशल कारागीर, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक, जेआर तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ, फोरमन, सर्व्हिस इंजिनिअर, वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, शिक्षक, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, बालरोग परिचारिका, ग्रुहा वस्त्रपाल, लॅब टेक अधिकारी, लॅब वैज्ञानिक अधिकारी, लॅब सहाय्यक, एक्स-रे टेक्निशियन. ब्लड बँक वैज्ञानिक अधिकारी, फार्मासिस्ट अधिकारी, डाएटिशियन, स्टाफ नर्स, ड्रायव्हर, प्लंबर, अभिलेखापाल, ज्युनियर क्लार्क, इलेक्ट्रीशियन, एएनएम, सीनिअर क्लार्क, लॅब टेक्निशियन, एक्स-रे तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, फार्मसी अधिकारी, ईसीजी टेक्निशियन, टेलर, रेकॉर्ड कीपर, हाऊस अँड लिनेन कीपर, स्टोअर व लिनन कीपर, एक्स-रे वैज्ञानिक अधिकारी, रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी, डायलिसिस टेक्निशियन, शिंपी, नलकरगिरी, सुतार, डेंटल हायजीनिस्ट, वॉर्डन, अबलेखापाल, सुतार, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, टेलर, ईसीजी तंत्रज्ञ या जागांची भरती केली जाणार आहे.

- Advertisement -

कंत्राटी कर्मचार्‍यांना दिलासा मिळणार?

दरम्यान, कोरोना संकट काळात कंत्राटी पद्धतीने काम करणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांचे नोकरीचे कंत्राट संपले असले तरी त्यांना आगामी काळात आणि इतर नोकर भरती वेळी सामावून घेण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. या उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी नोकरभरती प्रक्रियेत बदल करण्याचा सरकारचा विचार असल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. कोरोनाच्या संकटात कंत्राटी पद्धतीने काम केलेल्या आरोग्य कर्मचार्‍यांना कोरोना संकट कमी झाल्याने नोकरीतून काढून टाकले होते. या नोकर भरतीत या कर्मचार्‍यांना प्राधान्य दिले जाणार असल्याने त्यांना दिलासा मिळेल, असा विश्वास टोपे यांनी व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -