एकीकडे राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनं सुरू असताना या मागणीसाठी लढणाऱ्या लातूरच्या रमेश पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. लातूर जिल्ह्यातील माटेफळ तालुक्यात राहणाऱ्या ३० वर्षीय रमेश पाटील यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी सुसाईड नोट लिहिली असून यामध्ये आत्महत्येचे कारण नमूद केले आहे.
वाचा ः मुंबई, ठाणे, परळी वगळून ९ ऑगस्टला महाराष्ट्र बंद
नेमक काय लिहिलय पत्रात
मी आत्महत्या करत आहे. कारण मला एक मुलगा, दोन मुली आहेत. यांना शिकवून काहीच उपयोग नाही कारण माझी एक मुलगी एम. एस्सीच्या वर्गात विद्यापीठातून दुसरी तर लातूर जिल्ह्यातून पहिली आली आहे. तरीसुद्धा आरक्षणामुळे तीनही लेकरे घरीच असल्यामुळे मी निराश होऊन आत्महत्या केली आहे.
तुम्हीच विचार करा शिक्षण म्हणजे काय आहे. माझ्या पगारावर गाडा चालवला गेला. त्यामुळे खासगी कर्ज झाल्यामुळे तसेच शासनाने माझ्या पत्नीला प्रपंचाचा गाडा चालवण्यासाठी पेन्शन लवकर मंजूर करुन सहकार्य करावे.
– पाटील रमेश
असे भावनिक पत्र पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिले असून यातून त्यांनी अगतीकता स्पष्ट होत आहे. निराश आणि हताश झालेल्या पाटील यांनी सरकारकडे आपल्या मृत्यूनंतर कुटुंबियांच्या पालन पोषणासाठी लवकरात लवकर पेन्शन मंजूर करण्याची मागणीही केली आहे.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त महाराष्ट्र बंद
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर उद्या, ९ ऑगस्टला क्रांती दिनाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमधून मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि परळी ही चारही ठिकाणं वगळण्यात आली आहेत. या चारही ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. मराठा आंदोलक आणि ठाणे पोलिसांदरम्यान झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. प्रमुख शहरांना वगळण्याचा महत्त्वाचा निर्णय घेत आंदोलकांनी केवळ ठिय्या आंदोलन करण्याचं ठरवलं आहे.