जगभरासह देशात ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रादुर्भाव वाढत असून यावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत गंभीर वक्तव्य केलं आहे. सभागृहात बरेच सदस्य विनामास्क बसले होते. त्यावर बोलताना त्यांनी रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरीष्ठ पातळीवर देशपातळीवर सुरु आहे, असं अजित पवार म्हणाले.
“कालपासून अधिवेशन सुरु झालं, आजचा दुसरा दिवस आहे. आपण तीन, चार, पाच लाख लोकांचं प्रतिनिधीत्व दोन्ही बाजूचे सदस्य करत आहेत. स्वत: देशाचे पंतप्रधान देखील कोरोनाच्या संदर्भातील संकटाचा गांभीर्याने विचार करत आहेत. ज्यामध्ये रात्री लॉकडाऊन करण्याची चर्चा वरीष्ठ पातळीवर देशपातळीवर सुरु आहे. काही ठरावीक जण सोडले तर अजिबात इथे कोणी मास्क लावत नाही आहेत. संपूर्ण महाराष्ट्र इथे काय चाललं ते बघतोय. ठिक आहे, काही जणांना मास्कशिवाय चांगलं मांडता येत नाही. पण बोलून झाल्यावर तरी मास्क लावा,” असं अजित पवार म्हणाले.
“आज एवढी वाईट परिस्थिती आहे की कुणाला अंदाज नाही आहे. परदेशामध्ये दीड दिवसाला दुप्पट रुग्णांची संख्या चालली आहे. WHO ने सांगितलं आहे की परदेशामध्ये ५ लाखापर्यंत मृत्यूमुखी पडतील. हे झालं परदेशाचं…आपल्या भारताचं आणि महाराष्ट्राचं काय? काही काही गोष्टी त्यांचं गांभीर्य घ्यावं. आपण देखील कोणी घातलं नसेल, माझ्यासारख्याने जरी मास्क लावलं नसेल तरी मला बाहेर काढा. कुठे तरी गांभीर्याने घ्या ना. माझी विरोधी पक्षनेते आणि सर्वांना विनंती आहे. आपण सगळ्यांनी हे गांभीर्याने घेतलं पाहिजे,” असं अजित पवार म्हणाले.
हेही वाचा – सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा तपास करताना बिहार पोलीस भाजप नेत्याच्या गाडीने फिरत होते – नवाब मलिक