महाराष्ट्रात मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीही राज्यात कोरोना रुग्णांची संख्या २५ हजारच्या पार गेली. गुरुवारी राज्यात २५ हजार ८३३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. तर शुक्रवारी २५ हजार ६८१ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. त्यामुळे राज्यातल्या एकूण अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा आता १ लाख ७७ हजार ५६० इतका झाला आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या १,८०,८३,९७७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २४,२२,०२१ (१३.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८ लाख ६७ हजार ३३३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये, तर ७ हजार ८४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
७० जणांचा मृत्यू
मागील २४ तासांत कोरोनामुळे ७० जणांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्युदर २.२० टक्के इतका आहे. मात्र, समाधानकारक बाब म्हणजे आज दिवसभरात राज्यात १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत २१ लाख ८९ हजार ९६५ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले असून राज्याचा रिकव्हरी रेट ९०.४२ टक्के इतका आहे.
मुंबईत ३०६३ नवे रुग्ण
मुंबईमध्ये मागील २४ तासांत ३ हजार ६३ रुग्ण सापडले आहेत. राज्यात हा आकडा सर्वाधिक आहे. मुंबईत १० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच ठाण्यात २५६, तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रात ५५२ नवे कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. मात्र, एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही ही दिलासादायक बाब आहे.