मुंबईसह राज्यातही गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे जवळपास 5 हजारांचा टप्पा गाठणारी रुग्णसंख्या आता निम्म्यावर आली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांना काही प्रमाणात का होईना दिलासा मिळत आहे. यातच गेल्या 24 तासात राज्यात 2748 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 41 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्णसंख्या मात्र कमी होत असली तरी मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतचं आहे. काल 37 वर आलेली मृतांची संख्या आज पुन्हा 41 वर पोहचली आहे. तर आज 5806 रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे कोरोनातून बरे होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या ही 76,75,578 झाली आहे. यामुळे राज्यातील बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 97.77 टक्क्यांवर पोहचले आहे.
राज्यातील आत्तापर्यंतच्या नोंद झालेल्या कोरोनाबाधितां संख्या ही 78 लाख 50 हजार 494 झाली आहे. राज्यात सध्या 27 हजार 445 अॅटिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. आज 41 कोरोना मृतांमुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. सध्या राज्यात 2 लाख 79 हजार 743 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत. तर 1169 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
आजपर्यंत एकूण 7 कोटी 67 लाख 57 हजार 238 कोरोना चाचण्या केल्या असून यातील 78 लाख 50 हजार 494 कोरोना चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.
राज्यात 111 ओमिक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात गेल्या २४ तासात 111 ओमिक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. दिवसभरात आलेल्या चाचण्या या भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आणि बी जे वैज्ञानिक महाविद्यालयाने केल्या आहेत. राज्यात या ओमिक्रॉन आकडेवारीनुसार, मुंबईत आज एकाही ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली नाही, परंतु औरंगाबादमध्ये 10, नाशिक अहमदनगरमध्ये 21, नवी मुंबईत 19, जालना आणि यवतमाळमध्ये 15, नागपूर, मुंबईत प्रत्येक 9, ठाण्यात 6, मीरा-भाईंदर आणि साताऱ्यात प्रत्येकी 3 आणि लातूरमध्ये एका ओमिक्रॉनबाधित रुग्णाची नोंद झाली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण 4456 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 3334 रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आजपर्यंत एकूण 8904 नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी 7991 नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि 913 नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.