२४ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या. या पार्श्वभूमीवर देशाच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये अनेक राज्यांमधले नागरिक अडकून पडले आहेत. यामध्ये इतर राज्यांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. राजस्थानच्या कोटा या ठिकाणी देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकत आहेत. मात्र कोरोनामुळे हे सर्व विद्यार्थी अडकून पडले आहेत. या पार्श्वभूमीवर बिहार आणि उत्तर प्रदेशने कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी याआधीच बसेस पाठवून आपल्या राज्यातल्या विद्यार्थ्यांची सोय केली होती. आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे!
राजस्थानातील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १७८० विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता राज्य परिवहन मंडळाच्या ९२ बसेस उद्या दिनांक २९ एप्रिल २०२० रोजी धुळे येथून रवाना करण्यात येणार आहेत. @CMOMaharashtra @OfficeofUt @AjitPawarSpeaks @satejp @AUThackeray
#MaharashtraFightsCorona— Anil Parab (@advanilparab) April 28, 2020
राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी २८ एप्रिल अर्थात बुधवारी रात्री उशिरा यासंदर्भातलं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी कोटा, राजस्थानमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांना बसमधून परत आणण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ‘राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या महाराष्ट्रातील १७८० विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या ९२ बसेस २९ एप्रिल, गुरुवार रोजी धुळे येथून रवाना होणार आहेत. हा प्रवास लांब पल्ल्याचा असल्यामुळे प्रत्येक बसमध्ये दोन चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या ताफ्या ब्रेकडाऊन व्हॅनची देखील सुविधा पुरवण्यात आली आहे’, असं ट्वीट अनिल परब यांनी बुधवारी रात्री ११.४७ वाजता केलं आहे.
सदर प्रवास लांब पल्ल्याचा असल्याने प्रत्येक बसमध्ये दोन चालकांची नियुक्ती करण्यात आली असून ताफ्यात ब्रेक डाउन व्हॅनची सुविधा देखील पुरविण्यात आली आहे. @CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @satejp @AUThackeray#MaharashtraFightsCorona
— Anil Parab (@advanilparab) April 28, 2020
विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडणार!
दरम्यान, हे सर्व विद्यार्थी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून राजस्थानला शिकण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे त्यांना परत आणल्यानंतर त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये सोडण्यात येईल. असं करताना राज्य परिवहन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेतली जाईल, असं देखील अनिल परब यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
राज्य परिवहन कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.@CMOMaharashtra @OfficeofUT @AjitPawarSpeaks @satejp @AUThackeray #MaharashtraFightsCorona
— Anil Parab (@advanilparab) April 28, 2020