मुंबईः संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज आधी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि आता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलाय. विशेष म्हणजे सर्वोच्च न्यायालयानं नितेश राणेंना 10 दिवसांत शरण येण्यास संगितलंय. त्यावरून आता शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकरांनी राणेंना उपरोधिक टोला लगावलाय.
मिलिंद नार्वेकरांनी ट्विट करत राणेंवर हल्लाबोल केलाय. लघू सूक्ष्म दिलासा म्हणत मिलिंद नार्वेकरांनी राणेंवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे भाजपचे कार्यकर्तेही प्रचंड संतापलेत. विशेष म्हणजे एका नेटकऱ्याने मातोश्रीचा घरगडी म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. तर दुसऱ्याने घरगडी जरी असला तर प्रामाणिक आहेत. तुझा साहेब दरवर्षी नवीन पक्षात, आता 2024 ला तृणमूल की द्रमुक, असा सवाल केलाय. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून शरणागतीसाठी 10 दिवसांची मुदत दिलीय. त्यामुळे नितेश राणेंची अटक अटळ असून येत्या 10 दिवसांत नितेश राणे यांना जिल्हा न्यायालयासमोर शरण यावे लागणार आहे.
संतोष परब हल्लाप्रकरणी काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केलाय. आज सर्वोच्च न्यायालयात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी पार पडली. ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी यांनी नितेश राणेंच्या वतीने युक्तिवाद केला. तर सरकारच्या बाजूने ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला.
लघु सुक्ष्म दिलासा!
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) January 27, 2022
ज्येष्ठ वकील मुकूल रोहतगी नितेश राणेंच्या वतीने म्हणाले की, ‘या संपूर्ण प्रकरणात नितेश राणेंना चुकीच्या पद्धतीने अडकवण्यात आले आहे. तसेच पेपर कटरने जीवे मारण्याचा प्रयत्न होऊ शकतो का?’ असा सवाल करण्यात आला. तसेच पुढे रोहतगी म्हणाले की, ‘या प्रकरणात ज्यांची नावे आहेत, त्यांच्याशी मोबाईलद्वारे कोणताही त्यांचा संपर्क झाला नाही. विधानसभेत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना म्याव म्याव केल्याच्या प्रकारामुळे त्या प्रकरणाचा राग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.’