दूधाला प्रति लिटर ५ रूपये दरवाढीची मागणी करत सुरू झालेल्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आता रस्तावर उतरले असून दूध आंदोलनाची धार आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मात्र या आंदोलनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे तो पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ आणि वारणा दुधाला. गोकुळचे मुंबई ठाण्यासह मुंबई उपनगरात रोज ६ लाख लिटर दूध येते. पण आज ( गुरूवारी ) आंदोलनाच्या चौथ्या दिवशी केवळ ३ लाख लिटरच दूध मुंबई आणि ठाण्यामध्ये आले. वारणा दुधाची परिस्थिती काही वेगळी नाही. दूध आंदोलनाचा फटका हा वारणा दुधाला देखील बसला आहे. गरजेपेक्षा केवळ ५० टक्के पुरवठा करता आल्याने गोकूळ आणि वारणा दूधाला त्याचा फटका बसला आहे.
८० टक्के दूध पश्चिम महाराष्ट्रातील
विशेष म्हणजे मुंबईला आवश्यक असलेल्या दुधापैकी ८० टक्के दूध हे पश्चिम महाराष्ट्रातून येते. मात्र पश्चिम महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा जोर जास्त असल्याने पश्चिम महाराष्ट्रातील दुधाला त्याचा फटका बसत असल्याची प्रतिक्रिया गोकुळचे सेक्रेटरी कृष्णा पाटील यांनी माय महानगरशी बोलताना दिली.
महाराष्ट्रातील बाहेरील डेअरींचे ‘च्छे दिन’
दूध आंदोलनामुळे राज्याबाहेरील दूध डेअरींना अच्छे दिन आल्याचे पाहायाला मिळत आहे. अमुल आणि मदर डेअरी यांचे दूध विविध मार्गांनी मुंबईमध्ये येत आहे. राज्यातील दूध मुंबईमध्ये येणे शक्य नाही. त्यामुळे त्याचा फायदा हा अमुल आणि मदर डेअरींना होणार अशी प्रतिक्रिया देखील कृष्णा पाटील यांनी माय महानगरशी बोलताना दिली.
आंदोलन चिघळलं
दूध दरवाढीच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी बुधवारी राज्य सरकारच्या वतीने बुधवारी रात्री गिरीश महाजन यांनी राजू शेट्टी यांची भेट घेतली. मात्र भेटीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही. जोवर हक्काचे पैसे मिळत नाहीत तोवर आंदोलन सुरूच राहणार अशी माहिती खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. सरकार मागण्या मान्य करत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळपासून चक्का जाम आंदोलन केले. तर काही ठिकाणी एसटी देखील फोडण्यात आल्या.
नागपूरमध्ये आज बैठक
दरम्यान,आज दुपारी नागपूरमध्ये विधानसभा अध्यक्षांच्या दालनात बैठक होणार आहे. या बैठकीत आंदोलनावर तोडगा काढण्यासंदर्भात चर्चा होणार असल्याची माहिती मिळत आहे.