मागील अनेक वर्षांपासून रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकरात लवकर व्हावा. तसेच, या महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य नाहीसे करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली आहे. मनसे नेते अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली कोकण जागर पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा रविवारी सकाळपासूनच सुरू झाली असून या यात्रेत अमित ठाकरेंकडून सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. (MNS Amit Thackeray On Mumbai Goa Highway Slams BJP Leader Ravindra Chawan)
“महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला मुंबई-गोवा महामार्गावर यात्रा करावी असे सांगितले होते. लोकांना जागरूक करावे, लोकांना हे खड्डे काय आहेत? तसेच, १५ हजार कोटी रुपये आतापर्यंत खर्च झालेला आणि १७ वर्षांपासून सुरू असलेला रस्ता काय आहे हे लोकांना दाखवावा यासाठी ही यात्रा काढण्यात आली आहे”, असे अमित ठाकरे यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना अमित ठाकरेंचा सवाल
“आम्ही देशद्रोही मग या रस्त्यावर २५०० लोक मृत्यूमुखी पडले त्यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांना आपण काय म्हणाणार किंवा आम्ही काय म्हणायचं याचं त्यांना उत्तर द्यावं”, अशा शब्दांत अमित ठाकरे यांनी सवाल उपस्थित करत सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
“१७ वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गासाठी आंदोलन करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना देशद्रोही म्हणणार असाल तर ह्या खराब रस्त्यामुळे अपघातात जे मृत्युमुखी पडले त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांना काय म्हणायचं ? मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न प्रचंड गंभीर आहे आज आम्ही शांततेत पदयात्रा काढतोय…… pic.twitter.com/2JKQKh7aUJ
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 27, 2023
याशिवाय, “महाराष्ट्रसैनिक हे अनधिकृत कॉन्ट्रॅक्टर किंवा टोलवरील बाउन्सरसाठी नाहीत तर ते महाराष्ट्राच्या जनतेसाठी आहेत. त्यामुळे चुकीचं काम केल्यावर तशाच प्रकारचं उत्तर तुम्हाला मिळणार”, असा इशाराही यावेळी अमित ठाकरेंनी दिला.
आम्ही या चर्चासत्राला जाणार नाही – अमित ठाकरे
दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्राला जाणार का असा सवाल अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. त्यावर “आम्ही या चर्चासत्राला जाणार नाही. आताची यात्रा शांततेत आहे, यापुढची यात्रा शांततेत नसेल. तुम्हाला ज्या कारवाया करायच्यात त्या करा आम्ही लोकांसाठी लढत राहणार. आम्ही फक्त साहेबांच्या आदेशाची वाट पाहतोय”, असे उत्तर अमित ठाकरेंनी दिले.
हेही वाचा – मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद; मनसेच्या यात्रेपूर्वीच सरकारचा निर्णय