घरमहाराष्ट्रअन्यथा लॉकडाऊन वाढणार

अन्यथा लॉकडाऊन वाढणार

Subscribe

आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत

आपण सर्वांनी लॉकडाऊनच्या काळात शिस्त पाळली, सरकारच्या सुचनांचे पालन केले तरच १४ एप्रिलनंतर राज्यातील स्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊन काही भागांत शिथिल केले जाईल. हे सगळं लोकांच्या शिस्त पाळण्यावर अवलंबून आहे. मात्र तसे न झाल्यास राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवला जाऊ शकतो. खासकरून मुंबई आणि शहरी भागांमधील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात येईल असे संकेत शनिवारी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊनचा कालावधी १४ एप्रिल रोजी संपत असला तरी महाराष्ट्रामधील करोनाग्रस्तांची संख्या पाहता राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याचा इशारा टोपेंनी दिला आहे. देशातील सर्वाधिक करोनाग्रस्त हे महाराष्ट्रात आहेत, असं आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटवरील आकडेवारी सांगते. तसेच करोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक असल्याने राज्यात लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो. १५ एप्रिलपर्यंत राज्यातील करोनाबाधितांची संख्या कमी होण्याची आम्हाला अपेक्षा आहे, असेही टोपे म्हणाले. सध्या हा आकडा वाढत आहे. आपल्याला लॉकडाऊनचा कालावधी काही आठवड्यांसाठी वाढवावा लागणार आहे. मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध सरसकट उठवले जाण्याची शक्यता कमी आहे’, असे मत टोपे यांनी व्यक्त केले.‘देशव्यापी लॉकडाउनची घोषणा करण्याच्या दोन दिवस आधीच आम्ही राज्यामध्ये लॉकडाऊनची घोषणा केली होती.

- Advertisement -

त्याआधीही आम्ही राज्यातील शहरांमध्ये निर्बंध लागू केले होते. अनेक सर्वजनिक ठिकाणे बंद केली होती. मुंबईसारख्या शहरांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखणे हे कठीण काम आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपवण्याचा निर्णय हा पूर्ण विचार करूनच घेणे गरजेचे आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये हा कालावधी वाढवावा लागणार आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी वेगवेगळ्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा करताना लॉकडाऊनचे निर्बंध टप्पाटप्प्यामध्ये काढण्यासंदर्भातील संकेत दिले. लॉकडाऊन काढून घेण्यासंदर्भातील नियोजन राज्य सरकारने करावे आणि त्यासंदर्भात काही सल्ले अथवा सूचना असल्यास त्या केंद्र सरकारला कळवाव्यात असं आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केलं. मात्र, लॉकडाऊनचे सर्व निर्बंध एकदम उठवल्यास मागील अनेक आठवड्यांपासून करोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांचा आणि आतापर्यंत केलेल्या कामाला फारसा अर्थ राहणार नाही असे राज्यातील अनेक वरिष्ठ नेत्यांचे मत आहे.

- Advertisement -

मुंबईमध्ये करोनाचा फैलाव होण्याचा धोका असला तरी उपाययोजनांच्या बाबतीत राज्य सरकारने कोणतीही कसर सोडली नसल्याचे टोपे यांनी स्पष्ट केलं आहे. ‘आरोग्य कर्मचारी, पोलीस, महानगरपालिकेचे कर्मचारी जागोजागी काम करत आहेत. २९२ टीम सध्या मुंबईमध्ये काम करत आहेत. करोनाच्या संशयित रुग्णांना ओळखण्यासाठी मुंबईमध्ये ८०० जण काम करत आहेत. दिल्लीमध्ये मागील महिन्यात निझामुद्दीन येथे आयोजित करण्यात आलेल्या तबलिग जमातच्या कार्यक्रमातील व्यक्तींना संसर्ग झाल्याने राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. मात्र, आम्ही यावर नक्कीच नियंत्रण मिळवू, अशा शब्दांमध्ये टोपे यांनी मुंबईतील परिस्थितीचे वर्णन केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -