घरमहाराष्ट्रधार्मिक कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा

धार्मिक कार्यक्रमांसाठी घराबाहेर पडू नका, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करा

Subscribe

यावर्षीची पूजा-अर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे.

‘करोना’च्या रुग्णसंख्येत दररोज होणारी वाढ थांबली पाहिजे. त्यासाठी जात, धर्म, भाषा, प्रांतवाद बाजूला ठेवून सर्वांनी योगदान द्यावं. सोमवारी (6 एप्रिल) येणारी महावीर जयंती, बुधवारची (8 एप्रिल) हनुमान जयंती आणि त्याच रात्री असलेल्या ‘शब्ब-ए-बारात’साठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. यावर्षीची पूजा-अर्चा, धार्मिक प्रार्थना सर्वांनी आपापल्या घरातच करावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वधर्मीय नागरिकांना केलं आहे (Ajit Pawar on religious festivals amid Corona).

- Advertisement -

अजित पवार म्हणाले, राज्यात करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आज ती साडेपाचशेच्या आसपास आहे. ज्या भागात रुग्ण आढळत आहेत, ते भाग सीलबंद केले जात आहेत. डॉक्टर, पोलीस, पालिका कर्मचारी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहेत. रेशनदुकानांमधून गरिबांना अन्नधान्याचा पुरवठा सुरू करण्यात आला आहे. बहुतांश नागरिक घरात थांबून लढ्यात योगदान देत आहेत. या संपूर्ण लढ्याला, रस्त्यावर फिरणार्‍या, गर्दी करणार्‍या मोजक्या मंडळींमुळे धक्का बसत आहे. त्यामुळे कुणीही घराबाहेर पडू नये, रस्त्यावर फिरू नये.

करोनाविरुद्धची लढाई देश, देशवासीयांच्या अस्तित्वाची लढाई असल्यानं येणार्‍या काळात नियम, कायदे, आदेशांचा भंग करणार्‍यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.

- Advertisement -

करोनाविरुद्धचा लढा हा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातूनच जिंकता येईल. त्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. यापूर्वीही महाराष्ट्रानं अनेक संकटं परतवून लावली आहेत. करोनाच्या संकटांचं गांभीर्य ओळखून संपूर्ण महाराष्ट्र, आपण सर्वजण, एकजुटीनं, शहाणपणानं, घरातंच थांबून, करोनाचं संकट परतवून लावूया, असा निर्धारही यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -