महानगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकीत बहुसदस्यीय प्रभाग पद्धत असणार आहे. बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचं भाजपकडून स्वागत करण्यात आलं आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बहुसदस्यीय प्रभाग रचना, मतदारासाठी, जनतेसाठी चांगली ठरेल, असं मत व्यक्त केलं आहे. एकप्रकारे भाजपचा राज्य सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
“सर्वसामान्य माणसाला पर्याय असला पाहिजे, निवडणुका निर्भय वातावरणात कोणताही दबाव न राहता, आर्थिक बळ वापरुन करता आली पाहिजे ही भाजपची भूमिका होती. त्यासाठी भाजपने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत आणली होती. मविआ सरकारने एक सदस्यीय पद्धत आणली होती. भाजपने जनतेतून थेट सरपंच निवडा अशी पद्धत आणली होती. त्यामुळे कुठलेही आर्थिक पाठबळ नसलं, नेता नसला तरी समाजातील सर्वसामान्य माणूस जनतेसमोर जाऊ शकत होता. एक प्रभाग पद्धतीत मतं छोटी असतात, व्यक्तीचं प्राबल्य असतं, पर्याय राहत नाही. त्यामुळे त्यांनी तो निर्णय फिरवला आहे. बहुसदस्यीय प्रभाग रचना, मतदारासाठी, जनतेसाठी चांगली ठरेल,” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी होणार आहेत.
राज्यातील बहुतांश महापालिकांमधील भाजपचं वर्चस्व कमी करुन आपली ताकद वाढवण्यासाठी महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्न करत आहेत. त्यातून प्रभाग पद्धतीवरुन या तिनही पक्षांमध्ये एकमत होत नसल्याचं दिसत होतं. त्यामुळे अंतिम निर्णय होत नव्हता. पण ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आज अखेर मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.