आजपासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू करण्यात आली असून प्लास्टिक वापरणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाईला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये प्लास्टिक बाळगणाऱ्यांच्या पावत्या संबंधीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी फाडल्या आहेत. ही कारवाई मुंबई वगळता इतर सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीच्या पहिल्याच दिवशी काही नागरिक कारवाईचे बळी ठरले आहेत. प्लास्टिक बंदीच्या कारवाईतून मुंबईला वगळण्यात आले असले तरी उद्यापासून मुंबईकरांवर दंडात्मक कारवाई होणार आहे.
यांच्यावर झाली कारवाई
ठाणे महापालिकेतील वसुली अधिकाऱ्याने एका महिलेच्या नावावर ५ हजार रुपयांची पावती फाडली असून प्लास्टिक पिशवी प्रथम गुन्ह्याच्या अंतर्गत कारवाई केली. तर पुणे पालिकेच्या अधिकाऱ्याने वानवडी येथील नसिफ अन्सारी बेकरी पॅलेसच्या नावाने प्लास्टिक पिशवी गैरवापरावर दंड आकारला आहे. नाशिकमध्ये पालिका अधिकाऱ्यांनी जुनी पंडीत कॉलनीतील काबरा एम्पोरिअर यांच्याकडून प्लास्टिक पिशवी वापराबाबत दंड वसूल केला आहे. सोलापूरातील पालिकेच्या आरोग्य विभागाने पवन कुमार यांच्याकडून प्लास्टिक मोहिमे अंतर्गत कारवाई केली आहे. या व्यतिरिक्तही राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणी प्लास्टिक वापराविरोधात दंडात्मक कारवाई केली आहे.
मुंबईत मात्र कारवाई नाही
प्लास्टिक बंदीच्या पहिल्या दिवशीच कारवाईतून मुंबईला वगळण्यात आले आहे. मुंबईमध्ये आज कुणावरही कारवाई करण्यात आली नाही. आज फक्त जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या सहाय्यक आयुक्त संगिता हसनाळे यांनी दिली आहे. मात्र उद्यापासून मुंबईकरांनाही दंडात्मक कारवाईला सामोरं जावं लागणार आहे.
जनजागृती अभियान
मुंबईत अधिकाऱ्यांकडून जनजागृती करण्यात आली असून पालिकेकडून नेमण्यात आलेले २४९ अधिकारी आज प्रत्येक विभागात जनजागृती करत असल्याचे पहायला मिळाले. कॉफर्ड मार्केटमध्ये विविध वस्तू खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने मुंबईकर येतात. त्यामुळे संगीता हसनाळे यांनी पथकासोबत फिरून दुकानदार तसेच ग्राहकांमध्ये प्लास्टिक बंदीची जनजागृती केली.
अशी होईल कारवाई
दुकान, मार्केट, वसाहती यांच्यावरील संयुक्त कारवाईसोबतच संघटीत कारवाईदेखील पथक करणार आहेत. तसेच हे पथक सुरुवातीला ५ हजार रूपये दंड आकारणार असून दुसऱ्या वेळी १० हजार रूपये दंड आकारणी केली जाणार आहे. तर तिसऱ्या वेळी प्लास्टिक आढळल्यास २५ हजार रूपये वसुल केले जाणार आहेत. शिवाय त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करत त्याबाबत अहवाल तयार करून न्यायालयात अहवाल सादर केला जाणार आहे. विशेष म्हणजे कारवाई करताना आधारकार्डसोबत लिंक करून कारवाई केली जाईल, जेणे करून एखाद्या व्यक्तीवर यापूर्वी किती वेळा कारवाई झाली, हे सहज समजू शकणार आहे.