३० जूनपासून पालिकेने प्लास्टिक बंदी सक्तीची केली आहे. यापुढे प्लास्टिकची पिशवी वापरताना दिसाल तर थोडा थोडका नाही तर तब्बल ५ हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. तुमच्यावर पालिकेच्या अधिकाऱ्यांची करडी नजर असणार आहे. तुमच्या हातात पिशवी दिसली की, पालिकेचे कर्मचारी दंडाची कारवाई करणार आहे. पण नेमका कोणाला दंड द्यायचा असा प्रश्न तुम्हाला असेल. कारण इतका मोठा दंड जर देण्याची वेळ आली तरी हा दंड कोण आकारु शकणार हे देखील तुम्हाला माहित हवे.
२४९ कर्मचाऱ्यांची असणार नजर
प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी २४९ कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. मुंबई आणि उपनगरातील वेगवेगळ्या भागांमध्ये या कर्मचाऱ्यांची प्लास्टिक वापरणाऱ्यांवर नजर असणार आहे.
यांनाच दंड घेण्याचा अधिकार
अनेकदा अशा प्रकारचे दंड आकारताना भामटे सर्वसामान्यांना लुटण्याच्या घटना घडलेल्या आहेत. उदाहणादाखल द्यायचे झाले तर खोटे टीसी बनून प्रवासांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत. आता तर प्लास्टिक पिशव्यांचा दंड ५ हजार रुपयांचा आहे. त्यामुळे पालिकेने नेमलेले अधिकाऱ्यांची ओळख असणे गरजेचे आहे. पालिकेच्या या कर्मचाऱ्यांना निळया रंगाचे जॅकेट देण्यात आले आहे. शिवाय त्यांच्याकडे ओळखपत्र आणि चलान पुस्तक असेल. चलान फाडल्यानंतर पैसे भरण्यासाठीची केंद्रे जवळ ठेवण्यात येणार आहे.