कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीप्रमाणेच महायुतीत सुद्धा अद्यापपर्यंत जागावाटपाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. ज्यामुळे यांच्यामधील जागा वाटपाचा तिढा सुटणार कधी? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी लोकसभेत महायुतीने 48 पैकी 45 जागांवर विजयी होणार असल्याचा दावा केला आहे. त्या पद्धतीने आता त्यांच्याकडून मोर्चेबांधणी देखील करण्यात येत आहे. तर काही इच्छुक उमेदवारांनी थेट पक्षश्रेष्ठींकडेच त्यांना हव्या असलेल्या जागेची मागणी केली आहे. असेच काहीसे कोल्हापूर लोकसभेचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांच्याकडून करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मातोश्री येथे जाऊन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर कोल्हापूरचे ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी शेट्टींवर निशाणा साधत ठाकरेंकडे थेट लोकसभेच्या जागेची उमेदवारी मागितली. (Muralidhar Jadhav removed from the post of Kolhapur district chief, ‘these’ two leaders found guilty)
मुरलीधर जाधव यांनी ठाकरेंकडे लोकसभेच्या जागेची मागणी करताच त्यांच्यावर गटाकडून कारवाई करण्यात आली आहे. मुरलीधर जाधव यांची कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून या जागी दोन जिल्हाप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्यामुळे शेट्टींच्या विरोधात बोलणे जाधवांना महागात पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यानंतर आता मुरलीधर जाधव यांनी आता आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण यासाठी त्यांनी उद्धव ठाकरे यांना दोषी न ठरवता अन्य दोन नेत्यांना दोषी ठरवले आहे. जाधवांनी माजी आमदार सुजित मिणचेकर आणि सुषमा अंधारे यांना त्यांची पदावरून हकालपट्टी होण्यासाठी दोषी ठरवले आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार होताच मुरलीधर जाधव म्हणाले की, पक्ष संकटात असताना सगळ्यात जास्त प्रतिज्ञापत्र मी दिले. माझ्या मुलासह पत्नी आणि सगळ्यांची प्रतिज्ञापत्र सादर केली. असे असताना जर माझ्यावर कारवाई केली याचे दुःख वाटते, मला किमान बोलवून तरी मला माझी चूक सांगायला पाहिजे होती. शिवसेना या चार अक्षराच्या पक्षाने मला मोठे केले. मी उद्धव ठाकरे किंवा पक्षाबद्दल काहीही वाईट बोलणार नाही. माझ्या पक्षाचे चिन्ह आणि नाव टिकू दे यासाठी दिवस रात्र काम केले आहे.
तसेच, उद्योगमंत्री उदय सामंत यांना मी भेटलो, पण उद्धव ठाकरे यांची परवानगी घेऊन भेटलो. मी शिंदे गटात गेलो नाही म्हणून माझा एमआयडीसीमधील एक कोटीचा प्लॉट काढून घेतला, तरीही पक्षाने माझ्यावर अन्याय केला, असे म्हणत मुरलीधर जाधव यांनी एमआयडीसीमधील जागेबाबत खुलासा केला आहे. इतकेच नाही तर एमआयडीसीमध्ये कोट्यवधींचा भूखंड घोटाळा आहे. त्यामध्ये माजी आमदार सुजित मिणचेकर यांची टोळी काम करते. सुजित मिनचेकर यांनी सांगितले की, मुरलीधर जाधव यांचा प्लॉट काढून घ्या म्हणजे शिंदे गटात येतो असे शिंदे गटाला सांगितले. पक्षाने घेतलेला निर्णय वेदना देणारा आहे, असे सांगत असतानाच ते भावूकही झाले.
यावेळी त्यांनी माजी आमदार मिणचेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावर घणाघात करत म्हटले की, महाविकास आघाडीमधून तिकीट मिळाले तर हे मिणचेकर काय दिवे लावणार? कालपासून माझे मानसिक संतुलन बिघडले आहे. साहेबांनी या नेत्यांचे ऐकून निर्णय घेतलाच कसा असा प्रश्न पडला आहे, यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांचे नाव न घेता त्यांनाही यासाठी जबाबदार ठरले आहे. मला गोकुळ सोडले तर काय दिले सांगा. संजय पवार आज तुम्ही सुपात आहात मी जात्यात आहे, पण पवार साहेब तुम्ही देखील जात्यात याल, असा हल्लाबोलही यावेळी त्यांच्याकडून करण्यात आला आहे.