घरमहाराष्ट्रनाशिकनाफेडने बाजार समितीत येऊन कांदा खरेदी करावा : छगन भुजबळ

नाफेडने बाजार समितीत येऊन कांदा खरेदी करावा : छगन भुजबळ

Subscribe

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कांदा खरेदीवरून आंदोलने होत आहेत. विधानभवनात देखील कांदा प्रश्नावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. इकडे शेतकर्‍यावर कांदा पिकासह इतर पिके फुकट वाटण्याची वेळ आली आहे. रविवारी (दि. ५) छगन भुजबळ हे नाशिकमध्ये असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी भुजबळ म्हणाले की, आम्ही वेळोवेळी आवाज उठवतो आहे. त्यावर सरकार म्हणत आहेत की, आम्ही समिती नेमुन दुसरीकडे नाफेड बाहेर फार्मर्स कन्झ्युमर कंपनीसारख्यांकडून किंवा व्यापार्‍यांकडून माल घेत आहेत. व्यापारी इकडे 200-300 रुपयांनी कांदा खरेदी करत आहेत. तर नाफेडला 600 रुपयांनी देत असल्याचे भुजबळ म्हणाले. भुजबळ पुढे म्हणाले की, सदर प्रकाराबाबत मुख्यमंत्र्यांना सांगितले की, नाफेडला कांदा मार्केटमध्ये उतरायला सांगा, लासलगावमध्ये खरेदी करायला सांगा. ट्रॅकटरवर बोली लावायला सांगा, बाहेर काहीही उपयोग नाही. नाफेडने आतापर्यंत कांदा खरेदी केल्याचे आकडे चुकीचे असल्याचे भुजबळ म्हणाले. अडीच लाख टन खरेदी झालीच नाही. मागच्या वर्षीचा हा प्रश्न नाही, आता 15-20 दिवसांपासून जो कांदा फेकला जातोय, त्याचा आहे. पुन्हा एकदा याबाबत विधानसभेत बोलू आणि नाफेडला मार्केटमध्ये उतरायला सांगण्याचा आग्रह धरू, अशी ग्वाही यावेळी भुजबळ यांनी दिली.

- Advertisement -

नाशिकमध्ये शेतकर्‍यांकडून कोथिंबीर फेकून दिली जात आहे. मेथी फेकून दिली जात आहे. अशावेळी भुजबळ म्हणाले की, कोथिंबीर, मेथी शेतकरी फेकून देत आहेत. कोथिंबीरमागे गाडीभाडेही सुटत नाही. शेतकरी मेहनत करतोय, पण रस्त्यावर माल फेकावा लागत आहे. शेतकर्‍यांच्या पोटापाण्याचे हाल होत आहेत. त्यावर कोण बोलणार. अस्मानी सुलतानीची पण अडचण येते. भाजीपाल्याचे भाव वाढले तर आपणही सहन करायला हवे. कांद्याचे भाव वाढले तर लगेच निर्यात बंद केली जाते, सरकार सांगत आहेत की, निर्यात सुरू आहे, पण आता कांदा स्वस्त आहे. म्हणून निर्यात आहे.
सरकारने कांदा श्रीलंका, बांगलादेशला पाठवत नाही. युरोप किंवा इतर ठिकाणी कॉमर्स मिनिस्ट्रीशी जर संपर्क साधला आणि अनुदान दिले, तर दोन पैसे शेतकर्‍यांना मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे सध्याची परिस्थिती आहे. द्राक्ष, गहू यांना फटका बसेल. सरकारला सांगणे आहे की, शेतकर्‍यांना आपण मदत करायला हवी, शेतकरी हिच महाराष्ट्रची ताकद. 60 टक्के लोक या व्यवसायात आहे. उद्योगाला करोडो रुपयांची माफी देतात, तशी शेतकर्‍यांना द्यायला पाहिजे आणि शेती वाचवायला पाहिजे, असे आवाहन यावेळी छगन भुजबळ यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -