महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप होण्याची चिन्ह दिसतायत. ज्या नेते, आमदारांवर लक्ष आहे, ते फार बोलत नाहीयेत, मात्र काही नेते गेल्या काही दिवसांपासून सूचक संकेत देत आहेत. त्यातच आता द न्यू इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्रातील बातमीने राज्यभरात खळबळ माजवली आहे. अजित पवार एकाएकी पुण्यातले सगळे कार्यक्रम रद्द करून मुंबईत गेले. मुंबईत आपल्या विश्वासू व्यक्तींसोबत त्यांची खलबतं सुरु आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या 53 पैकी 40 आमदारांना घेऊन अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याचा दावा या वृत्तातून करण्यात आला आहे. प्रत्येकजण आपल्या खाजगी कामासाठी निघाल्याचं सांगत आहेत. तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिवसेना नेते त्यांच्या भाजप प्रवेशावर वक्तव्य करून अजित पवारांच्या चर्चेला हवा देत आहेत. अशात आता कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या सगळ्या घडामोडींवर आपली प्रतिक्रिया दिलीय.
अजित पवार भाजपसोबत जातील असं मला वाटत नाही, असा विश्वास यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी हा विश्वास व्यक्त केलाय. महाराष्ट्राच्या राजकारणातील नव्या समीकरणाबाबत माध्यमांनी त्यांना प्रश्न केले असता यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, “कमळ हा शब्द प्रेम दर्शवणारा शब्द आहे. कमळ हा दुसऱ्याची घरं तोडणारा होऊ शकत नाही. पण तानाशाहीचा चमत्कार होऊ शकतो. ईडी आणि सीबीआय या संस्था केंद्र सरकारने पोसून ठेवलेली आहेत. या संस्थाच्या माध्यमातून मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोकतंत्राच्या सगळ्या व्यवस्थेला ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आता लपलेलं नाही. हे संपूर्ण देशाला कळलेलं आहे.”
लोकतंत्रातील तानाशाहीच्या माध्यमातून देशाचं संविधान, लोकशाही आणि देशाला वाचवणं ही कॉंग्रेसची भूमिका असल्यानं यावेळी नाना पटोले यांनी स्पष्ट केलंय. कॉंग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. ६० वर्षापूर्वी या देशात सुई बनत नव्हती. सुई पासून ते रॅकेटपर्यंत देशाला महासत्ता बनवलं. देशाच्या जनतेला मुख्य प्रवाहात आणलं. पण भाजप सरकार देशाला बर्बाद करण्याचा प्रयत्न करत आहे. याविरोधात आमची लढाई आहे. जनता कॉंग्रेससोबत आहे, असं देखील नाना पटोले म्हणाले.
अजित पवार यांच्या पुढच्या राजकीय वाटचालीबद्दलच्या अटकळी गेल्या आठवड्यापासून जोरात सुरू आहेत. त्यामुळे अजित पवार भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. यावर प्रश्न विचारला असताना वज्रमूठ सभेच्या निमित्ताने आम्ही नागपूरमध्ये एकत्र होतो. अजित पवार हे भाजपासोबत जाणार नाही, असा विश्वास यावेळी नाना पटोले यांनी व्यक्त केला.”मी स्वतः माझ्या खासदारकीचे अडीच वर्ष बाकी असताना भाजप सोडून आलेलो आहे. ते कसे लोक आहेत, हे मला माहित आहे. भाजप पक्ष देशाला बर्बाद करण्यासाठी निघाला आहे. हे मी २०१७ मध्येच सांगितलेलं होतं. आज हे जनतेला पटलेलं आहे.”, असं देखील नाना पटोले म्हणाले.
भाजप हा लोकतांत्रित विरोधातला पक्ष आहे. त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा आरोपही यावेळी नाना पटोले यांनी केलाय. प्लॅन बी बद्दल विचारले असता यावर उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, “लोकशाहीमध्ये ज्याच्यासोबत जनता असते त्याला प्लॅन बी करायची गरज नसते. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणात बदलाव झालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कितीही समीकरणे बदलली तर जनता ही कॉंग्रेससोबत आहे.”