‘महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार विकास आणि प्रगती करण्यासाठी अस्तित्वात आलेलं नाही. कामं बंद करायचं, ठेकेदारांना बोलवायचं आणि त्यांच्याकजडून पैसे उकळण्याच्या हेतूनेच हे सर्व चाललेलं आहे’, असं भाजपचे नेते नारायण राणे म्हणाले आहेत. नारायण राणे यांनी कणकवलीमध्ये आज पत्रकार परिषद घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर नारायण राणे यांची ही पहिली पत्रकार परिषद होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षावर टीका केली.
नेमकं काय म्हणाले नारायण राणे?
पत्रकार परिषदेमध्ये मुख्यत: राज्यातलं परिवर्तन किंवा बदल आणि या बदलामुळे कोकणातील विकास कामांवर होणारा परिणाम, सिंधुदूर्गात ठप्प झालेली विकास कामं यावर प्रकाश टाकण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. महाराष्ट्रामध्ये २८ नोव्हेंबर रोजी नवीन सरकारचा शपथविधी झाला. आज ८ डिसेंबर आहे. आजमितीपर्यंत खातेवाटप होऊ शकलं नाही. खातेवाटप काय तर अजून मंत्रीही ठरलेले नाहीत. तीन पक्षाचं मिळून सरकार अस्तित्वात आलं आहे. या सरकारचं नाव मी स्थगिती सरकार ठेवलं आहे. या सरकारने गेल्या दहा दिवसांत एकच काम केलं आणि करत आहे. मेट्रो सारखी अन्य विकास कामं जी राज्यात चालू आहेत त्या विकास कामांना स्थगिती द्यायचं काम या सरकारने गेल्या दहा दिवसांत केलं. त्यामुळे हे विकास कामं बंद पडली असून ठप्प झालेली आहेत. हे सरकार विकास आणि प्रगती करण्यासाठी अस्तित्वात आलेलं नसून कामं बंदव करायचं, ठेकेदारांना बोलवायचं आणि त्यांच्याकजडून पैसे उकळण्याच्या हेतूनेच हे सर्व चाललेलं आहे.
हेही वाचा – ‘तारुण्यात आलेल्या प्रत्येकाला ऐश्वर्या हवी असते’; भाजप मंत्र्याचं अजब वक्तव्य
हे सरकार दिर्घकाळ चालणारं नसून काही महिन्याचं पाहुणं सरकार आहे. कोकणामध्ये या सरकारचं अस्तित्व अजून कुठे दिसत नाही. कोकणातील विकास कामं ठप्प झाली आहेत. याला पूर्ण जबाबदार शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष आहेत. हे तिन्ही पक्ष जनतेसाठी, शेतकरी कामगार उद्योजक यांच्या हितासाठी एकत्र आलेले नसून वैयक्तीक स्वार्थापोटी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे नक्कीच विकासावर परिणाम होणार. काल सिंधुदूर्ग जिल्ह्यात इथल्या खासदाराने आढावा बैठक घेतली. खासदार अशी आढावा बैठक कोणत्या आधाकारने घेतो? केंद्र सरकार भाजपचं असून त्यात शिवसेना नाही. सत्तारुढ खासदार नसताना शासकीय अधिकाऱ्यांना आदेश कसा देऊ शकतो? विमानतळ एक तारखेला चालू होणार हे कोणत्या अधिकारात सांगितलं? बेकायदेशीररित्या बैठका घेऊन आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा प्रयत्न शिवनसेनेकडून होतोय. ही जनतेची दिशाभूल आणि फसवणूक आहे.
हेही वाचा – महाविकास आघाडीत धूसफूस सुरु? अशोक चव्हाण यांचं सूचक वक्तव्य
येत्या १५ ते १८ डिसेंबरला सिंधुदूर्ग जिल्ह्यात गावभेटी घेणार आहोत. जनतेला या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष सरकार का स्थापन होऊ शकलं नाही, तीन पक्षाचं सरकार या महाराष्ट्र कसं पोषक नाही, राज्याला अधोगती नेणारं कसं सरकार आहे, यासंबंधीची माहिती जनतेला मिळावी. या सरकारने येताच २५,१५ ‘क’ वर्ग पर्यटन क्षेत्राच्या ज्या योजना आहेत त्याला स्थगिती दिल्या आहे. त्याविरोधात आवाज उठवला जाईल. विकासाबाबत अन्याय झाला तो अन्याय सहन करणार नाही. १५ ते १८ तारखेपर्यंत संपूर्ण जिल्हा ढवळून काढला जाईल. यामध्ये भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होतील. संपूर्ण जिल्ह्यात भाजपचं वातावरण निर्माण करण्यासाठी हा आमचा दौरा असेल