नांदगाव तालुक्यात कमी पर्जन्यमानामुळे सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्यामुळे एका शेतकर्याने रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत, तर दुसर्याने झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना तालुक्यात नुकतीच घडली.
तालुक्यात गतवर्षी कमी पर्जन्यमान झाल्यामुळे शेतीतून कुठलेच उत्पन्न न मिळाल्याने आणि सद्यस्थितीत दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने याचा सामना करताना शेतकरी हतबल झाला आहे. शुक्रवारी (२६ एप्रिल) सकाळी साकोरा येथील दत्तू एकनाथ बोरसे (वय ४०) या शेतकर्याने चाळीसगाव ते नांदगाव रेल्वे लाइनवरील कठीनात येथे नाशिकडे जाणार्या रेल्वेखाली स्वत:ला झोकून देत आत्महत्या केली. बोरसे यांच्या नावावर चार एकर जमीन होती. सतत नापिकी आणि तीन लाख रुपयांचे कर्ज, तसेच सोने तारण असल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. दुसर्या घटनेत साकोर्यापासून ७ किलोमीटर अंतरावरील मुळडोंगरी तांडा येथील रतन पुना चव्हाण (वय ६५) या शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सततची नापिकी आणि अंदाजे वीस ते बावीस लाख रुपयांच्या खाजगी कर्जाच्या ओझ्यामुळे त्यांनी शेतातल्या निंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. चव्हाण यांच्या नावावर देखील चार एकर शेतजमीन होती. गुरुवारी (२५ एप्रिल) त्यांच्या शेती विक्रीचा व्यवहार होऊ न शकल्याचीही गावात चर्चा होती. तालुक्यात एकाच दिवशी कर्जाला कंटाळून दोन शेतकर्यांनी आत्महत्या केल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.