नाशिक : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला असून, शहरातील जुने वाड्यांसह मोडकळीस आलेल्या सुमारे ११९२ घरांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. तसेच, पूरबाधित नागरिकांच्या स्थलांतरासाठी तात्पुरती निवासाची ठिकाणेही निश्चित करण्यात आली आहेत. पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेकडून आपत्कालीन बचाव पथकही तैनात केले जाणार आहे.
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज झाला आहे. १ जून ते १० ऑक्टोबर या कालावधीत महापालिकेच्या मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनात हा कक्ष सुरू राहील. पावसाळ्यात उद्भवणारी पूर परिस्थिती आणि अन्य आपत्तींचा सामना करण्यासाठी महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. याकरीता आपत्कालीन बचाव पथके तयार करण्यात आली आहेत. पावसाळापूर्व नालेसफाईची कामे हाती घेण्यात आली असून ६७ मलनिःस्सारण केंद्राची सफाई पूर्ण करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तर, ३२ मलनिःस्सारण केंद्रांची सफाई सुरू असल्याचे सांगण्यात आले. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील झाडांच्या फांद्या छाटण्याचेही काम सुरू आहे. शहरातील ५२ वाळलेली झाडे तोडण्यात आली आहे. ७४ धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम सुरू आहे. तसेच, शहरातील विद्युत खांब, केबल जॉइंट, कंट्रोल पॅनलचे ९० टक्क्यांपेक्षा जास्त देखभालीचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे.
दरवर्षी पावसाळा आला की, शहरातील धोकादायक बनलेल्या जुन्या इमारती, वाडे, घरांना महापालिकेच्या माध्यमातून नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. तशाच त्या यंदाही बजावण्यात आल्या असून नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्याचे या नोटीसीव्दारे सूचित करण्यात आले आहे.