नाशिक : शहरात होणार्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास प्रकाशक, ग्रंथ विक्रेते व प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली आहे. अवघ्या ३ दिवसांत १०५ स्टॉल्सचे बूकिंग झाले आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, वाशीम, नागपूर, कोल्हापूर, पुसद, जळगाव, नांदेड, परभणी, यवतमाळ येथील ग्रंथ विक्रेत्यांचा समावेश आहे.
संमेलनास अवघे २३ दिवस शिल्लक राहिले आहेत. संमेलनाचे कार्यालय कालिदास कलामंदिराच्या पहिल्या मजल्यावर तालीम हॉलमध्ये सुरु करण्यात आले आहे. संमेलनाच्या प्रतिनिधी नोंदणीमध्येही पुन्हा सुरुवात झाली आहे. मराठवाडा, मुंबई, उत्तर महाराष्ट्र येथून नोंदणी करण्यास साहित्य रसिकांनी सुरुवात केली आहे. संमेलनानिमित्ताने ४० समित्याही कार्यरत झाल्या असून, दररोज आढावा घेतला जात आहे. संमेलनामध्ये ग्रंथ प्रदर्शन हे मोठे आकर्षण असते. संमेलन स्थगित झाल्यानंतर काही प्रकाशकांनी व ग्रंथ विक्रेत्यांनी आपली नोंदणी मागे घेतली होती.
तरीही ५४ ग्रंथ स्टॉलधारकांनी आपली नोंदणी कायम ठेवली होती. संमेलनाच्या तारखा जाहीर होताच इतरांनीही चौकशीला सुरुवात केली होती. या संमेलनामध्ये प्रकाशन कट्टा हे ही एक महत्वाचे केंद्र व आकर्षण असणार आहे. यामध्ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या चरित्र ग्रंथांचे ५० खंड प्रकाशित होणार आहेत. यावेळी राजमाता शुभागिंनीराजे गायकवाड व उच्च माध्यमिक व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. ज्या प्रकाशक आणि लेखकांना आपले नवीन पुस्तकाचे प्रकाशन संमेलनामध्ये करण्याचे आहे, त्यांनी संमेलन कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे