इंदिरानगर : अंबड औद्योगिक वसाहतीमधील एक्सलो पॉइंटवर सकाळ आणि सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने अपघातांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या ठिकाणी शहर वाहतूक शाखेने कायमस्वरुपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी अंबड व सातपुर औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांसह कंपनी कामगारांकडून केली जात आहे.
अंबड व सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये विविध उत्पादनांची निर्मिती होत असते. त्यासाठी देशभरातून कच्चामाल तसेच, तयार मटेरियलची ने-आण करण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबादेसह गुजरात व इतर राज्यातून दररोज शेकडो मालवाहतूक करणारी वाहने येत असतात. यात भर म्हणून स्थानिक वाहतुकदार आणि दररोज कंपन्यांमध्ये कामासाठी ये-जा करणार्या कामगारांच्या वाहनांची मोठी भर पडते.
कंपन्यांच्या शिफ्टच्या वेळेतच सर्वाधिक वाहने रस्त्यावर येत असल्याने गरवारे पॉइंट आणि एक्सलो पॉईंट, तसेच पपया नर्सरी सिग्नल, पाथर्डी फाटा, सिम्बायोसिस कॉलेज इ. ठिकाणी दररोज वाहतुकीची मोठी कोंडी होते. या कोंडीमधून वाहने बाहेर काढण्यासाठी वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. सकाळी ७ ते ११ आणि दुपारी ४ ते सायंकाळी सात वाजेदरम्यान या तीनही पॉइंटवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते. त्यातही वाहतूक पोलिस नसल्याने पूर्णपणे वाहतूक व्यवस्था कोलमडते.
या सर्व प्रकारामुळे वाहनचालकांना कामावर जाताना विलंब होतोच, शिवाय अवजड वाहनांच्या गर्दीमुळे जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शहर वाहतुक शाखेची पाथर्डी फाट्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यानजीक एक चौकी आहे. तशी कायमस्वरुपी चौकी या ठिकाणी उभारण्याची मागणी अंबड तसेच, सातपूर औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांसह वाहनचालक तसेच, मालवाहतूकदार चालक-मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.