नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल शंभर टक्के लागल्याने अकरावी प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना जागा अपूर्ण पडत आहेत. तरी अकरावी प्रवेशाच्या जागा वाढवून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने नाशिकचे विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी यांच्याकडे केली आहे.
शहरातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपात पार पडली. आता प्रथम येणार्यास प्राधान्य या राऊंड अंतर्गत प्रवेश दिले जात आहेत. परंतु, विद्यार्थ्यांना अपेक्षित असणारे महाविद्यालय मिळत नाही. जागा रिक्त दिसत असल्या तरी बहुतांश महाविद्यालयांमध्ये प्रवेश पूर्ण झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे जागा वाढवण्याची मागणी मनविसेचे जिल्हाध्यक्ष शाम गोहाड, शहराध्यक्ष संदेश जगताप, ललित वाघ, उपाध्यक्ष सिद्देश सानप यांनी केली आहे. दरम्यान, विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये, यासाठी 20 टक्के जागा वाढवून देण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक उपासनी यांनी दिले.