बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील उंबर पांदी शिवारात रात्री बिबट्याने पुन्हा एक वासरू फस्त केले असून घटनास्थळी वन कर्मचारी देवकाते यांनी भेट देऊन पंचनामा केला. मागील पंधरवड्यात लांडगे शिवारात ही या आधी बिबट्याने हल्ला करून एक वासरू जखमी केले होते. वन विभागाने पिंजरा लाऊनही अद्याप बिबट्या जेरबंद होत नसल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे.
याआधी लांडगे शिवारात मंगळवारी रात्रीचे सुमारास बिबट्याने दत्तू जिभाऊ अहिरे यांच्या शेतातील त्यांच्या गोठ्यातील दोन वासरांवर अचानक हल्ला केला दोन गाई व दोन वासरे यांनी जोरात आवाज केल्याने परिसरातील सर्व शेतकरी जमा झाल्याने बिबट्याने धूम ठोकली होती. शेतकर्यांनी ट्रॅक्टर सुरू करून त्याच्या आवाजात रात्र जागून काढली. बिबट्याच्या हल्ल्यात एका वासराच्या गळ्याला नख लागली असून सकाळी जनावरांच्या डॉक्टरांना बोलावून त्याच्यावर उपचार करण्यात आले होते. सध्या परिसरात ऊसाबरोबरच मका, बाजरी पिकांची वाढ झाली असून त्यामुळे बिबट्याला गायब होण्यासाठी सोयीचे झाले आहे. मात्र, त्यातही परिसरातील सर्व शेतकरी भीतीपोटी पिकांना पाणी भरण्यासाठी जाताना घाबरत आहेत.
या आठ-दहा दिवसांत बिबट्याने तात्याबा अहिरे, दीपक खरे यांच्या शेतातील एक एक बोकड फस्त केले आहेत. त्यामुळे भीती वाढली आहे. आठ दिवसांपूर्वी रवींद्र पाटील यांना मक्याला पाणी देत असताना बिबट्याचा आवाज आल्यामुळे त्यांनी तेथून पळ काढला. परिसरात बिबट्याचे ठसे देखील दिसत आहेत. वनविभागाने त्यामुळे परिसरात आता पंधरा दिवसापासून पिंजला लावला असून पिकांमुळे बिबट्या सापडणे अवघड झाले आहे.
शेतीचे काम करत असताना भीती वाटते, शेतात गेल्यावर फटाके फोडावे लागतात मग शेतीत काम करतो, पंधरा-वीस दिवसांपासून बिबट्याची लांडगे शिवारात दहशत आहे. वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला आहे. – सचिन बच्छाव, शेतकरी, जुनी शेमळी