राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचे नियम कडक केले आहेत. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात देखील नियम कठोर केले असल्यामुळे चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्याची पंचाईत झाली आहे. दरवर्षी मुंबईतून मोठ्या संख्येनं चाकरमानी गणपतीसाठी कोकणात जातात. यंदा मात्र सिंधुदुर्ग प्रशासनाने त्यावर निर्बंध घातले असून येत्या ७ ऑगस्टला रात्री १२ वाजेपर्यंतच सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना प्रवेश दिला जाणार आहे. यासाठी ई पास देखील बंधनकारक करण्यात आला असून त्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी घेतलेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा २२ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी आहे. त्यामुळे दुसऱ्या जिल्ह्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या गणेशभक्तांना ७ तारखेच्या मध्यरात्रीपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. जेणेकरून गणेशोत्सवाच्या आधी १४ दिवस त्यांना क्वारंटाईन ठेवता येईल. त्याशिवाय येणाऱ्या चाकरमान्यांनी १४ दिवस क्वारंटाईन होण्यासाठी निवासाची व्यवस्था, तिथल्या सोयी-सुविधा यांची व्यवस्था लावूनच यायचं आहे. त्यासोबत त्यांच्या घरच्यांना देखील १४ दिवस घराबाहेर पडता येणार नाही. त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या भागातून सिंधुदुर्गात जाणाऱ्या चाकरमान्यांना ८ तारखेपासून सिंधुदुर्गात नो एंट्री असेल.
सध्या कोरोनाची महामारी बघता थोडंसं सगळ्यांनी समजून घ्यायला हवं. चाकरमान्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी अगोदर जावे. कारण जर गणपतीच्या काळात कोकणात गेल्यावर घरी जाऊन पूजा करता आली नाही तर इतका लांबचा प्रवास करून जाण्याचा काय उपयोग? त्यामुळे मी देखील परिवहन मंत्री आणि पालकमंत्री अनिल परब यांना भेटून यावर काय करता येईल का? याविषयी चर्चा करणार आहे.
दिपक केसरकर, शिवसेना आमदार
काय आहेत नियम?
क्वारंटाईन, ई पासचे नियम मोडणाऱ्यांना ५ हजारांचा दंड
बाहेरून जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ग्राम समितीकडे नोंदणी आणि वैद्यकीय तपासणी बंधनकारत
राजकीय पक्षांना गणेशभक्तांसाठी बस व्यवस्था करण्यावर बंदी
गणेशोत्सव काळात खरेदीसाठी गर्दी करू नये, त्याआधीच खरेदी करण्याचं आवाहन
गणेश मंडळांनी मूर्तीची उंची कमी ठेवावी, मिरवणुकांना बंदी
वाड्यांमध्ये एकत्र येऊन भजन करण्यावर बंदी, आपापल्या घरातच भजन-आरती करावी
पूजेसाठी पुरोहिताला घरी बोलवू नये, घरीच पूजा करावी किंवा ऑनलाईन पूजा करावी
विसर्जनाच्या दिवशीच्या म्हामंद प्रथेसाठी इतर कुणालाही घरी न बोलावता कुटुंबीयांनीच ते करावे
विसर्जन मिरवणुका न काढता सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं. मूर्तीसोबत फक्त दोनच सदस्यांना परवानगी