घरमहाराष्ट्रविरोधकांनी तारतम्य बाळगायला हवे, जालन्यातील घटनेवरून चित्रा वाघ यांनी सुनावले

विरोधकांनी तारतम्य बाळगायला हवे, जालन्यातील घटनेवरून चित्रा वाघ यांनी सुनावले

Subscribe

मुंबई : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीर जखमी झाले आहेत. मात्र यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी, विरोधकांनी तारताम्य बाळगायला हवे, असे सुनावले आहे.

- Advertisement -

जालन्यातील घटनेसंदर्भात चित्रा वाघ यांनी ट्वीट केले आहे. जालन्यात दुर्देवी घटना घडली आहे. मराठा आंदोलनकर्ते आणि पोलिसांत झटापट झाली. मराठा आरक्षणावर सरकार गंभीर आहे, म्हणूनच उपोषणकर्त्यांशी प्रशासनाचा संवाद सुरू होता. उपोषणकर्त्यांना कोणतीही हानी होऊ नये, त्यांचा जीव वाचविणे हाच पोलिसांचा उद्देश होता, पण दुर्देवानं पोलीस आणि आंदोलकर्ते यांच्यात तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांवरही हल्ला झाला. यात 12पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले, असे चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकत नसल्याने…, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप

- Advertisement -

मराठा समाजाच्या भावना समजून घेताना आंदोलनाला गालबोट लागायला नको होते. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनेवर सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे, पण समाजात तणाव निर्माण होत असताना त्याचे विरोधकांकडून जे खालच्या दर्जाचे राजकारण केले जात आहे, ते अतिशय चुकीचे आहे. कुठल्या गोष्टीचे राजकारण करावे, याचे तारतम्य विरोधकांनी बाळगायला हवे. राजकारण करण्याची ही वेळ नाही. समाजात सलोख्याची भावना टिकून राहणे हाच आपला प्राधान्यक्रम असला पाहिजे, असे त्यांनी विरोधकांना सुनावले आहे.

हेही वाचा – INDIA alliance : मोदी काय साध्य करीत आहेत? ठाकरे गटाचा हल्लाबोल

खरंतर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजबांधवांसाठी आरक्षण दिले. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात उच्च न्यायालयात समर्थपणे बाजू मांडून हे आरक्षण टिकवून देखील दाखवले. पण नंतर आलेल्या ठाकरे सरकारच्या काळात मात्र सर्वोच्च न्यायालयाने ते रद्दबातल ठरवले. आम्ही उच्च न्यायालयात जे टिकवून दाखवले, त्याबाबत ठाकरे सरकारने सर्वोच्च न्यायालयात सपशेल लोटांगण का घातले, याच्या खोलात आम्ही आता जात नाही. कारण, एखाद्या समाजाचं कल्याण हा कुणाच्याही राजकारणाचा विषय होऊ नये. एवढी प्रगल्भता विरोधकांकडूनही अपेक्षित आहे. त्यामुळे जालन्यातल्या दुर्दैवी घटनेचा वापर करून स्वतःची पोळी शेकण्याचा प्रयत्न विरोधकांनी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -