नाशिक : सूरत चेन्नई महामार्गासाठी जमीन संपादित करतांना समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर पाचपट मोबदला मिळावा अशी मागणी करत प्रकल्प बाधित शेतकर्यांनी एकत्र येत बी.डी.भालेकर मैदानावर आंदोलन केले. तेसच शासनाचा निषेध करत मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाइल असा इशारा देण्यात आला.
केंद्र सरकारच्या भारतमाला योजनेअंतर्गत सुरत-चेन्नई हा एक हजार २७० किलोमीटरचा ग्रीनफिल्ड महामार्ग साकारला जाणार आहे. हा महामार्ग राज्यातील नाशिक, नगर व सोलापूर या जिल्ह्यातून जाणार असून नाशिक जिल्ह्यातील सुरगारा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक व सिन्नर या सहा तालुक्यांतील जमिनी या महामार्गासाठी अधिग्रहीत केल्या जाणार आहेत. प्रकल्पासाठी नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड, नाशिक व सिन्नर या सहा तालूक्यातील जमीन अधिग्रहीत केली जाणार आहे. भविष्यात या महामार्गामुळे नाशिक-सूरत प्रवास अवघ्या पावणेदोन तासांत पूर्ण होणार आहे.
पण या प्रकल्पाला बाधित शेतकरयांनी विरोध केला आहे. आमच्या जमिनी घ्यायच्याच असेल तर आम्हाला समृध्दी महामार्गाच्या धर्तीवर बाजार भावाच्या पाच पट मोबदला द्या,जिल्ह्यात इतर क्षेत्रात बागायती प्रतीची जमीन देण्यात यावी, तसेच ,कुटुंबातील एका तरुणाला शासकीय सेवेत सामावून घ्यावे, रस्ता शेतकर्यांच्या जमिनीतून जात असल्याने कायमस्वरूपी टोल वसुलीच्या उत्पनातून ५% रक्कम बाधित गावांना मिळावी,जमिनी सातबारा उतार्यावर जिरायती दाखवण्यात आल्या आहेत त्या बागायती दाखवण्यात याव्या,सदर प्रश्न सोडवल्याशिवाय रस्त्याबाबतची कोणतेही कामे करण्यात येऊ नये अन्यथा शेतकरी रत्यावर उतरुन आंदोलन करतील, असा इशारा प्रकल्पातील जिल्ह्यातील बाधित शेतकर्यांनी दिली. यावेळी कम्युनिस्ट पक्षाचे अॅड. राजपालसिंग एन. शिंदे, अरुण वेळासकर, यशवंत लाकडे, मस्तान चौधरी, अॅड. समीर शिंदे, दिगंबर हांडगे, महेश घोलप, ज्ञानेश्वर रामभाऊ खाडे, कांतीलाल बोडके, अनिल सोनवणे, गणेश ढिकले, भाऊसाहेब गोहाड, समाधान पगारे आदींच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली.