सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोलापुरातील कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील 15 हजार घरांचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कामगारांचे नेतृत्त्व करणारे माजी आमदार नरसय्या आडम उपस्थित होते. यावेळी या घरात प्रवेश करणाऱ्या अनेक कुटुंबाना पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते घरांच्या चाव्या देण्यात आल्या. यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन केले. मी 2019 मध्ये दिलेला शब्द पूर्ण केला असून आधीच्या सरकारसारखे केवळ ‘गरिबी हटाओ’च्या घोषणाच नाही दिल्या. तर माझ्या कार्यकाळात 25 करोड लोकांना गरिबीतून मुक्त देखील केले आहे, असे सांगत पंतप्रधानांनी काँग्रेसवर निशाणा साधला. (PM Narendra Modi targeted Congress on issue of poverty alleviation during his visit to Solapur)
सोलापुरातील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमची सत्ता येण्याआधी देशात गरीबी हटावचे नारे दिले जात होते. आधी रोटी खाएंगे, लेकीन व्होट तुम्हेही देंगे, असे सांगायचे. पण अर्धी भाकरी का खायची, आपण पूर्ण भाकरी खाऊ आणि ही मोदीची गॅरंटी आहे. ज्यावेळी 2014 मध्ये आमचे सरकार आले, तेव्हाच मी सांगितले होते की, आमचे सरकार हे गरिबांना समर्पित सरकार आहे. यासाठी आम्ही एकामागोमाग एक अशा योजना लागू केल्या ज्यामुळे गरिबांचे प्रश्न सुटून त्यांचे जीवन सहज सोपे झाले पाहिजे. घर नसल्याने, शौचालय नसल्याने गरिबांना पावलोपावली अपमानित व्हावे लागले. मुख्यत्वे करून आपल्या महिलांसाठी, तरुणींसाठी, मुलींसाठी ही सर्वात मोठी शिक्षा होती. म्हणून त्यासाठी आम्ही सर्व प्रथम गरिबांचे घर आणि त्यांच्या शौचालय निर्मितीवर भर दिला.
यावेळी काँग्रेसवर निशाणा साधत मोदी म्हणाले की, राजकारणात आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी लोकांना भडकावण्याचे काम केले. अनेक वर्ष गरिबी हटाओच्या घोषणा देण्यात आल्या. पण ती गरिबी काही संपली नाही. याचे सर्वात मोठे कारण होते की, गरिबांच्या नावावर तर योजना बनवल्या जात होत्या. परंतु, त्याचा फायदा खऱ्या लोकांना मिळत नव्हता. पहिल्या सरकारमध्ये गरीबांच्या हक्काचा पैसा मधल्या दलालांकडून लुटण्यात येत होता. म्हणजे पहिल्याच्या सरकारची नियत, निती आणि निष्ठा खोटी होती. पण आमची नियत साफ आहे आणि निती गरिबांना मजबूत करण्याची आहे. आमची निष्ठा ही देशाप्रती आहे, असा दावा यामुळे मोदींकडून करण्यात आला.
तर, मागील काळातील गरिबांची अवस्था पाहून मोदींनी गॅरंटी दिली की आता गरीबांना त्यांच्या लाभाचा फायदा हा थेट त्यांच्या खात्यात मिळणार. कोणी दलाल नाही. कारण आम्ही लाभार्थ्यांच्या मार्गातील दलालांना हटवण्याचे काम केले आहे. हे जे लोक ओरडतात ना त्याचे कारण हेच आहे. कारण त्यांना मलाई मिळणे बंद झाले आहे. आम्ही मागील 10 वर्षात 30 लाख करोडपेक्षा जास्त गरीबांना, शेतकऱ्यांना, महिलांना, युवांना त्यांचा आर्थिक लाभ हा त्यांच्या बँक खात्यात दिला आहे. जनधन आणि यांसारख्या अनेक योजनांच्या माध्यमांतून आम्ही बोगस लाभार्थ्यांना बाहेर केले. ज्यांचा जन्मही झाला नव्हता, ते तुमच्या नावावर पैसे खात होते, असा लाखो लोकांचे खाते बंद केले, असा दावाही यावेळी मोदींकडून करण्यात आला.