भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.
राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना या पत्रातून दिला आहे.
सर्व देशबांधवांना मशिदिंवरील भोंगे उतरवण्यासाठी मी पत्राद्वारे आवाहन केल्यानंतर राज्य सरकार बेभान होऊन अंगात आल्यासारखं वागत आहे. देशाचे सर्वोच्च न्यायालय आणि विविध राज्यातील उच्च न्यायालयं यांनी दिलेल्या निर्णयांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी ४ मे रोजी भोंगे उतरवा आंदोलन सुरू करण्यापूर्वीच ठिकठिकाणी त्यांची धरपकड करण्यात आली. तब्बल २८ हजार महाराष्ट्र सैनिकांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या, हजारोंना तडीपार केलं आणि अनेकांना तुरूंगात डांबलं, कशासाठी?, ध्वनिप्रूषण करणारे, लोकांना त्रास देणारे मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवले जाऊ नयेत यासाठी, असं राज ठाकरेंनी पत्रामध्ये म्हटलं आहे.
गेला आठवडाभर महाराष्ट्र सैनिकांची दडपणूक करण्यासाठी राज्य सरकार ज्या पद्धतीने पोलीस बळाचा वापर करत आहे ते पाहता मला प्रश्न पडलाय की, मशिदींमध्ये लपवून ठेवलेली शस्त्रास्त्रे आणि अतिरेकी शोधून काढण्यासाठी अशी धरपकड मोहीम राज्य सरकारने किंवा पोलिसांनी कधी राबवली होती का?, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे;
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका.
सत्ता येत- जात असते.
कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही.
उद्धव ठाकरे, तुम्हीही नाही!@CMOMaharashtra pic.twitter.com/M0hpLg7sfP— Raj Thackeray (@RajThackeray) May 10, 2022
आमचा संदीप देशपांडे आणि इतरही अनेक कार्यकर्त्यांना पोलीस असे काही शोधत आहेत, जणू ते पाकिस्तानातून आलेले अतिरेकी किंवा निजामच्या हैद्राबाद संस्थानातले रझाकार आहेत. अर्थात महाराष्ट्र सैनिकांविरोधात ही अत्याचारी, दमनकारी कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसंना कुणी दिलेत हे समस्त मराठीजन हिंदूजन उघड्या डोळ्यांनी बघत आहेत.
दरम्यान, राज ठाकरेंच्या या पत्रानंतर शिवसेनेकडून कोणती प्रतिक्रिया येणार का किंवा एखादं परिपत्रक जारी केल जाणार का?, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा :अयोध्येच्या वादात महाराणा प्रताप सेनेची उडी, राजनंतर आदित्य ठाकरेंना नो एन्ट्री