घरमहाराष्ट्रवाळूचा लिलाव बंद, डेपोतूनच होणार विक्री; राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय

वाळूचा लिलाव बंद, डेपोतूनच होणार विक्री; राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय

Subscribe

 

मुंबईः राज्यातील सर्वसामान्यांसाठी स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याच्या महसूल विभागाने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयावर मंत्रीमंडळाने बुधवारी शिक्कामोर्तब केले. त्यामुळे ६०० रुपये प्रती ब्रास दरात वाळू उपलब्ध होणार आहे. याने जनसामान्यांना दिलासा मिळणार असून घरांच्या किंमतीही आवाक्यात येतील. वाळू लिलाव बंद होणार असल्याने डेपोतूनच ६०० रुपयात वाळू उपलब्ध होईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली. मुंबई मंत्रालय येथील दालनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.

- Advertisement -

राज्यातील वाळू लिलाव प्रक्रियेवरुन सातत्याने अनेक तक्रारी येण्याबरोबरच अनियमिततेला आळा घालण्यासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करण्याचा महत्वपूर्ण निर्णय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी घेतला आहे. राज्यात थेट नवीन वाळू धोरण आणण्याचे निश्चित केले. याच वाळू धोरणावर मंत्रीमंडळाने शिक्कामोर्तब केले.

या धोरणानुसार वाळू गटातून वाळुचे उत्खनन, उत्खननानंतर वाळुची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मिती व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. प्रायोगिक तत्वावर 1 वर्षासाठी संपूर्ण राज्यासाठी रुपये 600/- प्रती ब्रास (रुपये 133/- प्रती मेट्रीक टन) वाळू विक्रीचा दर निश्चित करुन स्वामित्वधनाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. याशिवाय वाळू वाहतूकीचा खर्च नागरीक करतील, अशी तरतूद करण्यात आली आहे. यासाठी शासना मार्फत आकारण्यात येणारे जिल्हा खनिज प्रतिष्ठाण निधी व वाहतूक परवाना सेवा शुल्क, इत्यादी खर्च अनिवार्य राहील, असा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री विखे- पाटील यांनी दिली.

- Advertisement -

असे आहे नवीन वाळू धोरण

राज्यातील नागरिकांना स्वस्त दरात वाळू / रेती मिळावी तसेच अनाधिकृत उत्खननाला आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत अपर जिल्हाधिकारी / जिल्हाधिकारी यांच्या स्तरावर समिती स्थापन करून वाळू / रेती उत्खनन, साठवणूक व डेपो व्यवस्थापन आणि ऑनलाईन प्रणालीव्दारे वाळू डेपोतून वाळू विक्री करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

केंद्र शासानाच्या पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय, खणिकर्म विभाग, मा. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण, मा. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी पारित केलेले आदेश/निर्देश/अटी व शर्ती विचारात घेवून पर्यावरण अनुमती व खाणकाम आराखडा इत्यादीबाबत कार्यवाही करण्यात येईल.

यापूर्वी राज्यातील नागरीकांना प्रति ब्रासनुसार वाळू विक्री करण्यात येत होती. त्यामध्ये आता बदल करून, प्रतिमेट्रीक टनामध्ये वाळू विक्री करण्यात येणार आहे.
नदी/खाडीपात्रातील वाळू/रेती उत्खनन, वाहतूक, डेपोनिर्मीती व व्यवस्थापन यासाठी ई-निविदा काढून निविदाधारक निश्चित करण्यात येणार आहे.

वाळू डेपोमधून “महाखनिज” अथवा शासन निश्चित करेल त्या ऑनलाईन प्रणालीव्दारे वाळू विक्री करण्यात येईल.

वाळू डेपो निर्मितीसाठी शहराजवळ/गावाजवळ शक्यतो शासकिय जमिनी निश्चित केली जाईल. ज्याठिकाणी शासकीय जमिन उपलब्ध होणार नाही. तेथे खाजगी जमीनी भाडे तत्वावर घेण्यात येतील.

नदी/खाडी पात्र ते डेपो पर्यंतचे क्षेत्र Geo fencing करण्यात येईल

प्रत्येक वाळू डेपोजवळ वाळूचे मोजमाप करण्यासाठी वजनकाटे (वे-ब्रीज) उभारण्यात येतील. सदर ठिकाणी CCTV व काटेरी कुंपण घालण्यात येईल .

वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना GPS प्रणाली बसवणे बंधनकारक करण्यात येईल.

प्रथम तीन वर्षासाठी अथवा सदर वाळूगटातील वाळु संपेपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल त्याकालावधीकरीता वाळू उत्खनन, वाहतूक व साठवणूक याबाबतची निविदा काढण्यात येतील.

नदी/खडी पात्रातून डेपो पर्यंत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहणांना विशिष्ट रंग देण्यात येईल.

वाळू डेपोतून नागरीकापर्यंत वाळू पोहचविण्यासाठी येणार खर्च नागरिकांना करावा लागेल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -