राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग अद्याप सुरू असल्याने कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बऱ्याच जिल्ह्यात कोरोना बाधितांसह मृतांचा संख्या वाढता असल्याने राज्यात लॉकडाऊन लागू असला तरी, कोरोनाचा प्रादुर्भाव असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात आहे. साताऱ्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने कोरोनाचा संसर्ग अटोक्यात आणण्यासह कोरोनाची साखळी तोडण्यासाठी २५ मेपासून ते १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
दरम्यान, साताऱा जिल्ह्यात २४ मे रोजी रात्री १२ वाजता लॉकडाऊन सुरु होणार आहे. यावेळी भाजीपाला, फळ मार्केट, किराणा विक्री, उपहारगृह, बार, लॉज सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः राहणार बंद आहेत. यासह विवाह सोहळा आणि अंत्यविधीला जाणासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट असणं आवश्यक राहणार आहे. तसेच कोरोना लसीकरण केल्याचे प्रणाणपत्रही बंधनकारक असणार आहे.
गेल्या २४ तासांत राज्यात २६ हजार १३३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६८२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५५ लाख ५३ हजार २२५वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ८७ हजार ३०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ३ लाख ५२ हजार २४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिवसभरात ४० हजार २९४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ५१ लाख ११ हजार ९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.०४ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५७ टक्के एवढा आहे.
जाणून घ्या, काय राहणार सुरू आणि काय बंद?
- लॉकडाऊनदरम्यान भाजी मार्केट, फळ मार्केट, बेकरी बंद
- आठवडी आणि दैनंदिन बाजारासह फेरीवाल्यांनाही बंदी
- उपहारगृह, बार लॉज, हॉटेल, रिसॉर्ट, मॉल बंद
- वाईन शॉप, बिअर शॉप, देशी दारू दुकाने बंद शिवाय घरपोच सेवाही बंद
- मटन, चिकन, अंडी, मासे विक्री बंद
- सर्व किराना दुकाने, कृषी उत्पन्न बाजार समिती सेवा बंद
- गॅरेज, स्पेअरपार्ट दुकाने बंद
- खाजगी आणि सहकारी अशा सर्व बँका बंद
- सर्व बांधकाम बंद
- प्रवासातून आलेल्याला १४ दिवस होम क्वारंटाईन बंधनकारक
- अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांव्यतरिक्त कोणालाच आता पॅट्रोल डिझेल नाही
- सकाळी ७ ते ९ वृत्तपत्र आणि दूध फक्त घरपोच