Chief Minister Eknath Shinde News | मुंबई – एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर राज्याच्या गादीवर कोण बसणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. शिंदे गट आणि भाजपाची सत्ता स्थापन झाल्यास देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री बनतील असे तर्क त्यावेळेस लावण्यात आले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनल्याने सर्वांनाच मोठा आश्चर्याचा धक्का बसला. ठाण्यातून ज्यांनी आपल्या राजकारणाची पाळेमुळे रोवली ते राज्याचे मुख्यमंत्री बनल्याने नेमक्या कोणत्याने कारणाने ते मुख्यमंत्री बनले असा प्रश्न सामान्य माणसासह सर्वांनाच पडला आहे. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी म्हटलंय की, २०१९ ची चूक सुधारायची होती म्हणून मुख्यमंत्री बनलो. एबीपी माझाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
हेही वाचा – औरंगाबादच्या नामांतराला इम्तियाज जलील यांचा विरोध; म्हणाले, मी मेलो तरी…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “2019 साली शिवसेना-भाजप युती म्हणून आम्ही लोकांसमोर गेलो. त्यामुळे लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिली. परंतु, बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत स्वार्थी आणि लालची भावनेने युती तोडून सरकार स्थापन केले. 2019 ला झालेली चूक सुधारायची होती. त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यावा लागला. मला मुख्यमंत्री देखील व्हायचे नव्हते. परंतु, 2019 ची चूक सुधारण्यासाठी आम्ही निर्णय घेतला आणि मी मुख्यमंत्री झालो.
ते पुढे म्हणाले की, आज आमच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. परंतु, आरोप कोणीही करेल. 40 आमदार आणि 12 खासदार आमच्यासोबत का आले याचा त्यांनी विचार केला पाहिजे. बाळासाहेबांच्या विचारांची पायमल्ली होत असल्याने आम्हाला असा निर्णय घ्यावा लागला. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना पक्षाची स्थापना केली. या पक्षात माझ्यासारखे लाखो कार्यकर्ते आहेत. कोण काय विचारतं यावर प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देत नाही. मी कमी बोलतो आणि काम जास्त करतो.
हेही वाचा – कसबा आणि चिंचवडसाठी आज मतदान, महायुती-मविआत अटीतटीची लढत
यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीकास्त्र डागलं. ते म्हणाले की, “महाराष्ट्र हे देशाच्या विकासाचे इंजिन आहे. डबल इंजिनचे सरकार असल्याने राज्य वेगाने प्रगती करत आहे. देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचं मोठं योगदान आहे. राज्यात अनेक प्रकल्प नव्याने सुरू केले आहेत. केंद्र सरकारसोबत हातात हात घालून काम करत आहोत. केंद्र सरकारसोबत योग्य पद्धतीने संवाद साधल्यानंतर ते राज्यांना मदत करतात. त्यासाठी घरातून बाहेर पडलं पाहिजे. घरातून फेसबुकवरून संवाद साधून विकास होत नाही.