मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आक्षेपार्ह भाषेचे पडसाद विधिमंडळात उमटले होते. त्यानंतर जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. ही एसआयटी चौकशी म्हणजे, फडणवीस यांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’ असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – Maharashtra Budget Session : कुसुमाग्रजांच्या कवितेवरून विजय वडेट्टीवारांचा अजित पवारांना चिमटा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतीत अपशब्दांचा वापर केला. त्याचे पडसाद विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उमटले. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केली असता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या मागणीला मान्यता दिली.
मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे कोण हे शोधावेच लागेल. दगडफेक करायला कुणी सांगितले? पोलिसांनी लाठीचार्ज का केला? मनोज जरांगे पाटील यांना रात्री घरातून बाहेर आणणारे कोण आहेत? त्यांना भेटणारे कोण आहेत? कुणासोबत बैठक झाली? असे प्रश्न फडणवीस यांनी विधानसभेत उपस्थित केले.
याच अनुषंगाने सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. मातृतीर्थ ते शिवतीर्थ मुक्त संवाद अभियानाअंतर्गत कल्याण पूर्व येथे सुषमा अंधारे यांची काल, बुधवारी सभा झाली. त्यात त्या म्हणाल्या, एसआयटी चौकशीची घोषणा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाना’ आहे. नाव जरी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे घेत असले तरी, त्यांचा निशाणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आहे, एवढे न समजण्याइतके आम्ही दुधखुळे नाहीत. दोघांमध्ये जे शीतयुद्ध सुरू आहे, ते आम्हाला माहीत आहे. पण आम्हाला या गलिच्छ राजकारणावर बोलायचे नाही. त्यांना त्याचीच चर्चा हवी आहे. त्यांना वाढती महागाई आणि बेरोजगारी, विद्यार्थ्यांचे प्रश्न, महिलांची असुरक्षितता असा जनसामान्यांच्या प्रश्नावर कोणी बोलूच नये असे त्यांना वाटत असल्याचा दावा त्यांनी केला.