यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या एका पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत आक्षेपार्य मजकूर छापण्यात आला आहे. या पुस्तकात सावरकरांचा दहशतवादी असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या मजकूराच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला आहे. वीर सावरकरांविषयी असणारा हा मजकूर पुस्तकातून वगळण्यात यावा, अशी मागणी अभाविपने केली आहे.
विद्यापीठाने माफी मागावी – अभाविप
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कला शाखेतील द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमातील इतिहासाच्या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांसोबतच अनेक स्वातंत्र्य सेनानींवर वादग्रस्त मजकूर छापून आला आहे. या पुस्तकात दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ असा धडा आहे. या धड्यात वीर सावरकर, वासुदेव बळवंत फडके, पंजाबचे रामसिंह कुका, लाला हरदयाळ, रासबिहारी बोस आदींच्या कार्याबाबत विवेंचन करण्यात आले आहे. त्यांनी उभारलेल्या चळवळीचा ‘उल्लेख दहशतवादी क्रांतिकारकांची चळवळ’ असा केला गेला आहे. यावर अभाविपने आक्षेंप घेतला आहे. क्रातिकारकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांचा दहशतवादी म्हणून उल्लेख करणे, चुकीचे आहे. मुक्त विद्यापीठाद्वारे विद्यार्थ्यांना चुकीचा इतिहास शिकवला जात आहे, असे अभाविप म्हटले आहे. दरम्यान, विद्यापीठाने या चुकीबद्दल माफी मागावी आणि हा धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात यावा, अशी मागणी अभाविपने केली आहे.
‘नक्कीच सुधारणा करण्यात येईल’
दरम्यान, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु व्ही. वायूनंदन यांनी यामध्ये निश्चितपणे सुधारणा होईल, असे सांगितले आहे. ते म्हणाले की, ‘२००१ साली हे पुस्तक लिहले गेले होते आणि त्यातील उल्लेख आमच्या निदर्शनास आला नाही. आम्हाला कोणताही वाद नकोय. त्यात सुधारणा नक्कीच करण्यात येईल.’ त्याचबरोबर आमच्याकडून निश्चित चूक झाली आहे. क्रांतिकारकांचा उल्लेख दहशतवादी म्हणून करणे चुकीचे आहे, असे विद्यापीठाच्या नागपूर केंद्राचे संचालक नारायण मेहरे म्हणाले आहेत.