Sanjay Raut | मुंबई – सातत्याने गैरहजर राहिल्याने खासदार संजय राऊत यांना शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावलं होतं. परंतु, संजय राऊत त्यांनी ताततीडने न्यायालयात हजेरी लावत वॉरंट रद्द करून घेतला आहे. संजय राऊत नुकतेच १०० दिवस तुरुंगात राहून सुटून आले आहेत. त्यामुळे अजामीनपात्र वॉरंट निघताच त्यांनी न्यायालयात धाव घेतली आणि वॉरंट रद्द करून घेतले.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणीत सातत्याने गैरहजर राहिल्याने न्यायदंडाधिकारी पी.आय.मोकाशी यांनी संजय राऊत यांना आजीमनपात्र वॉरंट जारी केलं होतं. मुंबई उच्च न्यायालयात एका प्रकरणात सुनावणी सुरू असल्याने शिवडी न्यायालयात पोहोचणे जमले नाही. वाहतूक कोंडीमुळे वेळेत पोहोचू शकलो नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती. त्यानंतर, ते लागलीच शिवडी न्यायालयात पोहोचले आणि अजामीनपात्र वॉरंट रद्द करून घेतला.
हेही वाचा – संजय राऊतांच्या अडचणी वाढणार, कोर्टाने बजावले अजामीनपात्र वॉरंट
संयज राऊत यांनी किरीट सोमय्या (Kirit Somaiya)आणि मेधा सोमय्या (Medha Somaiya) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील १६ शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच, साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान, याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी त्यांना अनेकवेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, तेव्हा दिल्लीत संसदेच्या पावसाळी अधिवेशनामुळे हजर राहता आले नाही. त्यानंतर ते ईडीच्या कोठडीत होते. त्यामुळे सुनावणीला हजर राहू शकले नाहीत. मात्र, आताही ते हजर राहिले नसल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं होतं.