मुंबई : जालना येथील आंतरवाली गावात पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर केलेल्या लाठीमारावरून राजकारण तापले आहे. या घटनेवरून विरोधक आक्रमक झाले असून ठाकरे गटाने उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘जनरल डायर’ म्हटले आहे. तर, भाजपाने या टीकेवर पलटवार केला आहे.
ह्या ‘सामना’वीराने झाडलेल्या फुसक्या फैरी ऐकल्या. आम्ही जनरल डायर की आणखी कोण, ते मायबाप महाराष्ट्रच ठरवेल
पण,
देवेंद्र फडणवीस जी यांच्या सरकारने दिलेल्या आणि मोठ्या कष्टाने उच्च न्यायालयात टिकवलेल्या मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 4, 2023
मराठा आरक्षणासाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे हे आपल्या 10 सहकाऱ्यांसोबत आमरण उपोषणाला बसले होते. शुक्रवारी पोलिसांकडून या आंदोलकांवर अमानुषपणे लाठीमार करण्यात आला. पोलिसांकडून गोळीबार देखील करण्यात आल्याचे आंदोलकांनी सांगितले. या घटनेचे हिंसक पडसाद आता राज्यातील विविध भागांमध्ये उमटायला सुरुवात झाली आहे. शिवाय, विविध पक्षांचे नेते घटनास्थळी जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेत आहेत. तसेच, संपूर्ण घटनेची माहिती घेत आहेत.
हेही वाचा – …म्हणून शांततेने सुरू असलेले मराठा आंदोलन चिरडण्याचा निर्णय, ठाकरे गटाचा थेट आरोप
ठाकरे गटाने थेट उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर शरसंधान केले आहे. स्वातंत्र्यलढ्यात अमृतसरमध्ये ब्रिटिशांनी जसे जालियनवाला बागेचे हत्याकांड घडवले, त्याच घटनेची आठवण व्हावी, असा हा राक्षसी हल्ला होता. या प्रकरणात पोलिसांपेक्षा अधिक दोष उपोषण चिरडण्याचे आदेश देणाऱ्या जनरल डायरचा आहे. त्याच्यावर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे काय? असा सवाल ठाकरे गटाने सामना दैनिकातील अग्रलेखातून केला आहे.
भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ट्वीट करत या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही जनरल डायर की आणखी कोण, ते मायबाप महाराष्ट्रच ठरवेल. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने दिलेल्या आणि मोठ्या कष्टाने उच्च न्यायालयात टिकवलेल्या मराठा आरक्षणावर वरवंटा फिरवणारा खरा जनरल डायर हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते, असा आरोप त्यांनी केला आहे.
हेही वाचा – शैक्षणिक निधीसाठी प्रशांत दामलेंचा अमेरिका दौरा
तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नाकर्त्या धोरणाची परिणती सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण धारातीर्थी पडण्यात झाली. आरक्षण टिकवण्याच्या जबाबदारीपासून पळालेले तुम्ही भगोडे आणि कायर आहात, असा पलटवार चित्रा वाघ यांनी केला आहे.