अहमदनगर : अतिवृष्टीचा फटका शेतकर्यांसह कोपरगाव तालुक्यातील व्यापार्यांनासुद्धा बसला आहे. टाकळी रस्त्यालगत काही व्यापार्यांनी शेतकर्यांचा खरेदी केलेला कांदा साठवून ठेवला होता. अचानक आलेल्या पाण्यामुळे या शेडमधील व्यापार्यांचा कांदा पाण्यात वाहून गेला. परिणामी, व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले. पाण्याचा प्रवाह थांबल्यावर उरलेला कांदा पाण्यावर तरंगत होता. भिजलेला हा कांदा वाया गेल्याने व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले. यामुळे गुरूवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांद्याचे लिलावही बंद ठेवण्यात आले होते.
टाकळी रोडवरील या व्यापार्यांना दोन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीचाही तडाखा बसला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा वाहून गेला होता. आता पुन्हा या कांदा व्यापार्यांचे नुकसान झाले आहे. शेतकर्यांकडून खरेदी केलेला कांदा वाहून गेला. तसंच सततच्या पाण्यामुळे साठवून ठेवलेला कांदा सडला आहे. त्यामुळे शेतकर्यांना कांद्याचे पैसे कसे द्यायचे, अशी चिंता आता या व्यापार्यांना सतावत आहे. काहींनी स्वतःचे पैसे उपलब्ध करून शेतकर्यांना बिले दिली. मात्र त्यांचा कांदा वाहून गेल्याने तोटा झाला आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या संकटामुळे व्यापार्यांची कोंडी झाली आहे.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी गुरूवारी सकाळी या नुकसानीची पाहणी केली आणि सर्व कांदा व्यापार्यांना धीर दिला. झालेल्या नुकसानीची पाहणी करून त्यांनी तहसीलदार विजय बोरूडे यांना पुढील कार्यवाहीच्या सूचना केल्या. कोल्हे म्हणाले, बुधवारी पहाटे मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे मध्यरात्री आलेल्या पाण्यामुळे काहीच कळले नाही. नैसर्गिक संकट भयावह आहे. यापूर्वी एवढ्या मोठया प्रमाणात पाऊस कोसळला नाही. विजेचा कडकडाट होता. या व्यापार्यांचे मोठे नुकसान झाले असून, त्यांना धीर देऊन प्रशासकीय पातळीवर या संकटाचे गांभीर्य लक्षात आणून दिलं आहे. संजीवनी आपत्ती व्यवस्थापन केंद्रामार्फत मदतकार्य सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.