घरताज्या घडामोडीयात्रा म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन नव्हे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

यात्रा म्हणजे स्वातंत्र्य आंदोलन नव्हे! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला

Subscribe

ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव आयोजित करण्याचे निश्चित केले.

कोरोनाचे संकट समोर दिसत असताना आरोग्य विषयक सुविधा निर्माण न करता काही जणांना यात्रा काढायच्या आहेत. जनतेचे प्राण धोक्यात आणणारे कार्यक्रम आयोजित करणे दुर्दैवी असून हे काही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेले आंदोलन नाही, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी भाजपला लगावला. हे सरकार कोणत्याही सणांविरुद्ध नाही तर कोरोनाच्या विरोधात आहे. कोराना हा काही सरकारी कार्यक्रम नाही. कोरोनाला अटकाव घालण्यासाठी जगभरात जी शिस्त आणि नियम सांगितले आहेत त्याचे पालन करावेच लागेल, असे बजावताना ठाकरे यांनी केंद्रानेही सणांच्या दरम्यान संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त करून राज्य सरकारला काळजी घ्यायला सांगितले आहे, याची आठवण विरोधी पक्षाला करून दिली.

ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठानच्यावतीने मंगळवारी दहीहंडी उत्सवाचे आयोजन न करता आरोग्य उत्सव आयोजित करण्याचे निश्चित केले. त्याचाच एक भाग म्हणून आमदार प्रताप सरनाईक फाऊंडेशन आणि विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने दोन ऑक्सिजन प्रकल्पांची उभारणी करण्याचे निश्चित करण्यात आले. यापैकी आज ठाण्यातील दुसर्‍या प्लांटचे लोकार्पण ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी बोलताना जनआशीर्वाद यात्रा आणि मंदिर उघडण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार्‍या भाजपवर ठाकरे यांनी निशाणा साधला.

- Advertisement -

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असून केंद्र सरकारनेही हेच सांगितले आहे. त्यांनी दहीहंडी आणि गणेशोत्सव काळात गर्दी टाळावी, असे राज्याला पत्र पाठवून कळवले आहे. जे आंदोलन करू इच्छितात त्यांना केंद्र सरकारचे हे पत्र आपल्याला दाखवायचे आहे, असे ठाकरे यांनी सांगितले. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिवसेनेची ओळख आहे. त्यामुळे शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे एक वेगळे नाते आहे. त्यामुळेच शिवसेनेबद्दल लोकांना, ठाणेकरांना वाटणारा विश्वास आजही कायम आहे. पण दुर्दैवाने आज १०० टक्के राजकारण केले जात आहे, असे ठाकरे म्हणाले.

दहीहंडीचा उत्साह आणि उत्सव याला काही काळासाठी आपण मुकलो आहोत याची मला जाणीव आहे. तो थरार, ते उधाण मला अजूनही आठवते; पण आज गर्दी करून उत्सव साजरी करण्यासारखी परिस्थिती नाही. कोरोनाचे संकट जगभर पसरले आहे. आज प्रताप सरनाईक कोरोना विरोधात जे आंदोलन करत आहेत, तसे करण्याची गरज आहे. पण दुर्दैवाने तेवढी प्रगल्भता इतर काही लोकांमध्ये दिसत नाही. आपल्या बेशिस्त वागणुकीतून ते शिस्त पाळणार्‍या लोकांचे जीवनही अडचणीत आणत आहेत, अशी खंतही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार संजय राऊत, आमदार प्रताप सरनाईक यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -