घरमहाराष्ट्रलठ्ठपणा व मधुमेह रोखण्यासाठी स्वतःवर प्रयोग करा - डॉ. जगन्नाथ दीक्षित

लठ्ठपणा व मधुमेह रोखण्यासाठी स्वतःवर प्रयोग करा – डॉ. जगन्नाथ दीक्षित

Subscribe

दिवसातून दोन वेळा जेवण करणे, ४५ मिनिटात साडेचार कि.मी. चालणे हा ९० दिवसांचा प्रयोग स्वतःवर करून बघा, त्याने लठ्ठपणा कमी होऊन संपूर्णपणे मधुमेहावर विजय मिळविता येईल, असा महत्वपूर्ण सल्ला दीक्षित डाएटचे संस्थापक व जगप्रसिध्द मधुमेह तज्ज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी श्रोत्यांना दिला.विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासना अंतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २३ व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेतील कार्यशाळेच्या ‘मधुमेह प्रतिबंध आणि विनासायास वेटलॉस’ या विषयावर ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते.

डॉ. जगन्नाथ दीक्षित म्हणाले, प्रत्येकाची मानसिकता ही आहे की तुमच्या वजनाची जबाबदारी दुसर्‍या कोणी तरी घ्यावी, हे चुकीचे आहे. जोपर्यंत जीभेचे चोचले पुरविले जातील तोपर्यंत तुमच्या शरीरात अतिरिक्त ऊर्जा ही चरबीच्या स्वरूपात साठविली जाणारच. त्यामुळेच तुमच्या वाढत्या वजनाला नियंत्रण करण्याची जबाबदारी ही तुमचीच आहे.जीवनशैलीत बदल झाल्यामुळे इन्सुलिन निर्मितीमध्येसुद्धा बदल झालेला दिसून येतो. मुख्यतः इन्सुलिन हे ५० टक्के पायाभूत स्त्रोत व ५० टक्के खाण्यामुळे निर्माण होते. या दोन्हीमध्ये अनुक्रमे १८ ते ३२ युनिट तयार होते. त्यामुळेच खाण्याच्या सवयीला नियंत्रित करणे गरजेचे आहे. मुख्यतः वजन हे १९ ते ३४ या वयात अधिक वाढते, अशा वेळेस कष्ट करावयाची व व्यायामाची सवय लावली तर मधुमेहासारखे आजार टाळत येतील. शरीराला कार्बोहाइड्रेड व ग्लुकोजची आवश्यकता असते आणि ग्लुकोज हे मेंदूला आवडते त्यामुळे आम्हाला ऊर्जा मिळते, तर शरीराला चरबी जाळायला आवडते.

- Advertisement -

इन्सुलियनचे सर्वात मोठे कार्य शरीरात ऊर्जा साठविण्याचे असते. तसेच, इन्सुलिनची पातळी कमी करण्यासाठी दोन वेळा जेवण करा, दोन जेवणामध्ये काहीही खाऊ नये, जेवताना शक्यतो गोड कमी खा, शक्यतो टाळा आणि जेवणात प्रथिने वाढवा. आपल्या शरीराला डस्टबिन बनविण्याऐवजी जेवण करण्याची पद्धत शिका. सुरूवातीला फळे खावीत, नंतर सॅलेड, मोड आलेले कडधान्य, भाजी पोळी आणि शेवटी दूध प्यावे. तसेच दोन जेवणामध्ये केवळ पाणी, ताक, ग्रीन टी, नारळ पाणी किंवा टोमॅटोच्या दोन फोडी खाव्यात. भूक लागणे ही आपली मानसिक दशा आहे. त्यामुळे भुकेपेक्षा कमी खाणे शरीरास सर्वोत्तम आहे. आपल्या जेवणात प्रथिने वाढविली पाहिजेत.

मधुमेह हा जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. त्यामुळे याला घाबरून न जाता आपल्या संत व ऋषींनी सांगितल्यानुसार जो एक वेळा जेवतो तो योगी, दोन वेळा जेवतो तो रोगी आणि तीन वेळा जेवतो तो भोगी. हेच सूत्र ध्यानात ठेऊन प्रत्येकाने आपली दिनचर्या ठरवावी.प्रा.डॉ. मंगेश कराड म्हणाले, आपले शरीर हे सर्वात मोठी संपत्ती आहे. त्यामुळे त्याचा सांभाळ करणे हे आवश्यक आहे. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष दिलेले आहे, त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनावर आम्हाला चालण्याचा प्रयत्न करावयाचा आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -