केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रम मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CMUddhav Thackeray) यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे झालेली अटक आणि त्यानंतर जामीनावर सुटका झाल्यानंतर त्यांनी यात्रेचा पुन्हा एकदा शुभारंभ केला आहे. यात्रेच्या तिसऱ्या टप्प्याला त्यांनी रत्नागिरीत सुरुवात केली आहे. या दरम्यान राणे शिवसेनेवर काय बोलणार? याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं असताना नारायण राणे यांनी खळबळजनक आरोप केले आहेत.
नारायण राणे यांनी रत्नागिरीत कार्यकर्त्यांना संबोधित करताना टप्प्याटप्प्याने प्रकरणं बाहेर काढेन असा गर्भित इशारा दिला. एवढंच नव्हे तर आपल्याच वहिनीवरती अॅसिड फेकायला कुणी सांगितलं होतं? असा खळबळजनक आरोप नारायण राणे यांनी नाव न घेता केला आहे. “आपल्या बंधूच्या पत्नीवर म्हणजे वहिनीवर अॅसिड फेकायला कुणी सांगितलं पोराला. काय संस्कार? आपल्याच भावाच्या पत्नीवर अॅसिड फेकलं. ही प्रकरणं मी टप्प्याटप्प्याने काढणार. सुशांतची केस संपली नाही आहे. दिशा सालियान प्रकरण अजूनही बाकी आहे. आम्ही भारतीय नागरिक आहोत. तुम्हाला जो कायदा तो आम्हालाही आहे. दादागिरी करू नका, तो तुमचा पिंड आहे. तुम्ही आम्हाला अनुभवलं आहे. आमच्या वाटेला जाऊ नका. आता पूर्वीसारखा दोन दिवसात आवाज खणखणीत झाल्यानंतर वाजवणार.” असा सज्जड दमही राणेंनी दिला.
“नैसर्गिक आपत्तीत मृत पावलेल्यांना द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. कसली भाषणं करता. मी मग सोडणार नाही. आता जुन्या गोष्टी काढणार, काढा ना. दोन वर्षे झाली अजूनही शोधताहेत. नाही मिळालं. आम्हालाही जुन्या गोष्टी माहिती आहेत. रमेश मोरेची हत्या कशी झाली? त्याचं कारण काय आहे?” अशी खळबळ उडवून देणारे प्रश्न राणे यांनी केले.