घरमहाराष्ट्रअंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या मराठवाडयातील महिलांना पचंगंगेत बुडताना जीवरक्षकांने वाचविले

अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या मराठवाडयातील महिलांना पचंगंगेत बुडताना जीवरक्षकांने वाचविले

Subscribe

कोल्हापूर : महालक्ष्मी मंदिरात अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या मराठवाड्यातील महिलांना पंचगंगेत बुडताना वाचवण्यात आले आहे. जीवरक्षकांच्या सतर्कतेमुळे मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात आले असून दोन महिलांना सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार शनिवारी (13 मे) सकाळी घडला.

मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातून क्षीरसागर कुटुंबीय नातेवाईकांसह अंबाबाई दर्शनासाठी शनिवारी पहाटे कोल्हापूरमध्ये आले होते. यातील नऊ आंघोळीसाठी पंचगंगेत उतरल्या असताना माधुरी दत्ता अंबाडे (35) या महिलेचा पाय घसरला आणि त्या खोल पाण्यामध्ये पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी कोमल सुरेश क्षीरसागर (45) पुढे गेल्या, पण त्या सुद्धा  तोल जाऊन पाण्यामध्ये पडल्या. या दोघींना वाचवण्यासाठी पुढे गेलेल्या शामल राजकुमार क्षीरसागर (50) आणि मंगल सुरेश मगर (45) याही बुडू लागल्या. एकाचवेळी चार महिला बुडू लागल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी आरडाओरडा सुरू केली.

- Advertisement -

जीवरक्षक उदय निंबाळकर, विनायक जाधव आणि अजिज शेख घाटावर व्यायाम करत होते. त्यांना नागरिकांच्या आवाज ऐकू आल्यानंतर त्याच्या हा सर्व प्रकार निदर्शनास आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीत उड्या घेतल्या आणि चारही महिलांना बाहेर काढले. खरं तर चार महिलांना पाण्याबाहेर काढताना जीवरक्षक उदय निंबाळकर यांची चांगलीच दमछाक झाली. त्यांनी प्रसंगावधान राखून अजित शेख यांना इनर ट्यूब टाकण्याची सूचना केली आणि इनर ट्यूबद्वारे महिलांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले. पाण्यातून बाहेर काढल्यानंतर चारही महिलांना उपचारांसाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी माधुरी अंबाडे आणि कोमल क्षीरसागर यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्या अत्यवस्थ झाल्या होत्या.

दहा दिवसांपूर्वीच तरुणांचा बुडून मृत्यू
शनिवार पेठ येथे राहणाऱ्या पृथ्वीराज चंद्रकांत गवळी (20) या तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. पृथ्वीराज हा डिप्लोमाचा विद्यार्थी होता आणि तो मित्रांसोबत दुपारी 4 वाजता पंचगंगेच्या काठावर पोहण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचे मित्र पोहून काठावर आले, मात्र पृथ्वीराज पोहत होता आणि थोड्या वेळाने तो बुडू लागला. पृथ्वीराज बुडतो आहे हे त्याच्या मित्रांच्या लक्षात येताच त्यांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्री उशिरापर्यंत नदीत बोटीच्या साहाय्याने शोध घेतला. मात्र पृथ्वीराजचा मृतदेह सापडला नाही. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी दिनकर कांबळे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी ऑक्सिजनच्या मदतीने नदीतून मृतदेह बाहेर काढला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -