अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्या पसंतीक्रमाच्या कॉलेजामध्ये प्रवेश मिळूनही मुंबईतील सुमारे सात हजार विद्यार्थ्यांनी कॉलेजांमध्ये प्रवेश घेतला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हे विद्यार्थी अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर फेकले जाणार आहेत. त्यांच्या या बेफिकीरीने त्यांच्या कॉलेज प्रवेशाचे बारा वाजणार अशी चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, मुंबईत सात हजाराच्या आसपास असलेला हा आकडा राज्यात पंधरा हजारांच्या घरात आहे. या विद्यार्थ्यांना यापुढे आता त्यांच्या आवडीच्या कॉलेजामधील प्रवेशाचे दरवाजे बंद झाले आहेत. मुंबईसह राज्यात पाच ठिकाणी अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांना १ ते १० कॉलेजांचे पसंतीक्रम भरावे लागतात. ज्या कॉलेजांमध्ये प्रथम प्रवेश हवा आहे, त्यांनी त्या कॉलेजांना प्राधान्य देणे गरजेचे असते. तर ज्या कॉलेजांना पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश जाहीर केले जातात. त्यांना त्याठिकाणी प्रवेश निश्चित करणे बंधनकारकदेखील असते. मात्र त्यानंतर मुंबई विभागातील हजारो विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे कॉलेज जाहीर होऊनही प्रवेश घेतलेले नाहीत.
हजारो विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश घेतले नाही
नुकत्याच जाहीर झालेल्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीत मुंबईतील एकूण ३५ हजार ७८५ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश जाहीर करण्यात आले होते. त्यापैकी अवघ्या २७ हजार ६९२ विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रवेश निश्चित केले, तर ७ हजार ८०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नसल्याची माहिती मिळाळी आहे. मुंबईसह पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती याठिकाणीदेखील हजारो विद्यार्थ्यांनी पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश घेतले नसल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश न घेतल्याने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर
दरम्यान, पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश जाहीर घेतल्यानंतर त्या कॉलेजांमध्ये प्रवेश घेणे बंधनकारक असते. मात्र त्यानंतरही या विद्यार्थ्यांनी प्रवेश न घेतल्याने ते आता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून बाहेर गेले आहेत. त्यामुळे आता या विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाची नवी अडचण येणार आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रवेश देण्याबाबत विचार सुरु आहे, अशी माहिती शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
विभागनिहाय पहिल्या पसंतीक्रमाचे प्रवेश नाकारल्याची माहिती
मुंबई- ७,८०७
पुणे- ३,७०८
नाशिक- १,४७४
नागपूर- २,३७३
औरंगाबाद-१,८९५
अमरावती- ८०१
सौरभ शर्मा । मुंबई